गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक अनेक गंभीर आरोप एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि भाजपवर करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘नवाब मलिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ही लढाई पुढे अशीच सुरू राहिल. अजूनही काही गोष्टी समोर आल्या नाहीत. फक्त नकाब नाही, तर कपडेही उतरली आणि म्हटल्याप्रमाणे इंटरव्हलनंतर माझी एंट्री होईल.’
आज औरंगाबादमध्ये महागाई विरोधातील आक्रोश मोर्चा खासदार संजय राऊत नेतृत्वाखाली निघणार आहे. त्यापूर्वी संजय राऊत यांची औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी त्यांनी नवाब मलिकांच्या पाठिशी मुख्यमंत्र्यासह राज्याचे सर्व मंत्रिमंडळ असल्याचे सांगितले. नवाब मलिक न्यायाची लढाई लढातायत. संपूर्ण महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मलिक लढत आहेत, असं राऊत म्हणाले.
पुढे राऊत म्हणाले की, हे प्रकरण वेळीस संपावे, अशी आमची इच्छा होती. पण भाजपला अजूनही शहानपणा येत नसेल, तर आम्हाला असं वाटतं ही लढाई सुरुच राहिल आणि अजूनही काहीच समोर आलं नाही. मी असं मागे देखील म्हणालो होता की, इंटरव्हलच्यानंतर माझी एंट्री होईल. नवाब मलिकांचा इंटरव्हल झालेला नाही, हा चित्रपट मोठा असणार आहे. जे आमच्या अंगावर पाठी मागून वार करायला येतायत किंवा महिलांना अपमान करायचा नाही, पण मर्दासारखे समोर या. दुसऱ्यांचे खांद्ये आणि दुसऱ्यांचे गंजलेल्या बंदुका, तलवारीतून आमच्यावरती हल्ले करू नका, आम्ही तुम्हाला घाबरत नाही.
आज सकाळी नवाब मलिकांनी ‘उतरेंगे और कई नकाब’ असे ट्वीट केलं होत. त्यावर राऊत म्हणाले की, ‘फक्त नकाब नाही कपडे उतरलीत. नकाब ही छोटी गोष्टी आहे. तुम्ही पाहत राहा काय होतंय. आमचे नवाब मलिक सगळ्यांना भारी पडले आहेत. त्यांच्या लढाईला नैतिक बळ आहे. मुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळाचा त्यांना पाठिंबा आहे आणि मलिक चुकतायंत असं राज्यातील जनतेला वाटत नाही.’