राजाच्या राजकारणात एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची सातत्याने चर्चा होते ते उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार. अनेकदा ते त्यांचा दिलखुलास वक्तव्यांवरून चर्चेत असतात. अजित पवार यांनी देवगीरी बंगला पूर्वीच्या मंत्र्याकडून अद्याप रिकामी होत नसून सध्या मुंबईतील त्यांच्या घरात कार्यकर्त्यांना बसायला जागाच उरत नसल्याचे बोलून दाखविले. कार्यकर्त्यांना आता माझ्या बेडरुमपर्यंत यावे लागत आहे, असेच चालू राहिले तर मग बायको मलाच घरातून हाकलून देईल, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली.
"तर बायको घराबाहेर हाकलून देईल" देवगिरी बंगला मिळत नसल्याची खंत अजित पवार यांनी आपल्या शैलीत बोलून दाखवली. pic.twitter.com/st1336wn8w
— My Mahanagar (@mymahanagar) February 15, 2020
आता तर माझ्या बेडरूममध्ये लोकांना बसवायचं राहिलं
बारामतील येथील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी शासकीय घराबद्दल आपली खंत व्यक्त केली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, बारामतीतले कार्यकर्ते काही कामाच्या निमित्ताने मुंबईत येतात. त्यावेळी, आपण नाराज होतो. कारण मुंबईतले घर लहान आहे. सरकार येऊन आता 100 दिवस झाले तरी काय करतोय बाबा कुणास ठाऊक? आता तर माझ्या बेडरूममध्ये लोकांना बसवायचं राहिले आहे. तिथे जर कार्यकर्त्यांसोबत बसलो तर बायको मला हाकलून देईल, असे अजित पवार म्हणताच उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला.
अजित पवार यांनी दिला इशारा
तसेच माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करा, अन्यथा सिंगल वोटिंगवर निवडून येणाऱ्या संचालकाचा जागेवर राजीनामा घेऊ, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे. त्याचवेळी निवडणुकीदरम्यान काहीजण गंमतीजमती करतात. त्यांनी आता थांबावं.. अन्यथा आपण गंमतीजमती सुरू केल्या तर मदतीलाही कोणी येणार नाही, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.