घरमहाराष्ट्रइग्नू’च्या ज्योतिषविषयक अभ्यासक्रमाला अंनिसचा विरोध

इग्नू’च्या ज्योतिषविषयक अभ्यासक्रमाला अंनिसचा विरोध

Subscribe

विद्यापीठाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी अविनाश पाटील यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) सन २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष विषयातील दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.ए. ज्योतिष) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रह-तार्‍यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, पंचाग, मुहूर्त, कुंडली आणि ग्रहणवेध आदी विषयांची विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करीत असल्याचे ‘इग्नू’ने म्हटले आहे. या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने विरोध केला असुन विद्यापीठाने तो त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले की, यापूर्वीचे भाजपचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी सन २००१ मध्ये यूजीसीच्या माध्यमातून ज्योतिष विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, प्रा. यशपाल आणि देशातील इतर अनेक प्रमुख वैज्ञानिकांनी या निर्णयाला जाहीर विरोध केल्याने त्यावेळी तो निर्णय सरकारला रद्द करावा लागला होता. तत्पूर्वी सुमारे २५ वर्षे आधी अमेरिकेतील जागतिक स्तरावरच्या ‘द ह्युमॅनिस्ट’ मासिकाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर १९७५ या अंकातून डॉ. एस. चंद्रशेखर आणि इतर 18 नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञांसह एकूण १८६ प्रथितयश शास्त्रज्ञांनी स्वाक्षर्‍या करून फलज्योतिष विरोधी निवेदन प्रसिध्द केले होते. अतिदूर असणारे तारे किंवा ग्रह मानवी जीवनावर प्रभाव टाकतात, हे असत्य असून फलज्योतिषाच्या भाकीतांना कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे त्यांनी त्यात ठामपणे नमूद केलेले होते.

- Advertisement -

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेली 30 वर्षे खगोलविज्ञानाचा प्रसार करीत आहे. एवढेच नाही, तर फलज्योतिषाचा फोलपणा प्रबोधनाच्या माध्यमातून समाजासमोर सातत्याने मांडत आलेली आहे. वैज्ञानिकांनी घेतलेल्या या भूमिकेशी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती सहमत असून या अभ्यासक्रमाला ठाम विरोध करत आहे. एका बाजूला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) तरूणाईला सोबत घेऊन चंद्राला अथवा मंगळाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि दुसर्‍या बाजुला ‘इग्नू’ सारखे नामांकित विद्यापीठ समाजातल्या काही मूठभर लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी तरूणाईला ज्योतिषाची पदवी बहाल करीत समाजाला कडक, मंगळ आणि शनिच्या साडेसातीत अडकवणार आणि सोडवणार असेल, तर ही कृती संविधानविरोधी आहे. अशा प्रकारच्या समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत लोटणार्‍या या निर्णयाचा समिती ठाम विरोध करीत आहे. शिक्षणातून शहाणपण येते असा अंनिसचा ठाम विश्वास आहे. मात्र ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणार्‍या ‘इग्नु’सारख्या विद्यापीठातून समाजाला अंधश्रध्देच्या खोल गर्तेत ढकलणारे शिक्षण देणे ही सरकारची प्रतिगामी कृती आहे. कोरोनाने निर्माण केलेली बेरोजगारी आणि आर्थिक विवंचना यातून बाहेर पडण्यासाठी धडपडणार्‍या तरूणाईमध्ये अवैज्ञानिक भाकडकथा रुजवण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘इग्नू’ने हा अभ्यासक्रम त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र
अंनिसने केली आहे.

विसंगत अभ्यासक्रम नकोच 

जागतिक पातळीवर ज्योतिष विषयाला कोणताही शास्त्रीय आणि सैद्धांतिक आधार नाही. असा आधार नसणारा गैरलागू आणि विसंगत अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरु करु नये. ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ चालवले जाते, त्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतः अत्यंत प्रगतशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या नेत्या होत्या. त्या हयात असत्या, तर त्यांनीही या निर्णयाला ठाम विरोधच केला असता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -