घरताज्या घडामोडीजागरूक राहून समन्वयाने काम करा, मुख्यमंत्र्यांची कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

जागरूक राहून समन्वयाने काम करा, मुख्यमंत्र्यांची कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Subscribe

नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना वेळीच योग्य माहिती द्या

येत्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि काळजीपूर्वक काम करावे. तसेच नागरिकांना वेळीच सूचना मिळतील याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले. उद्धव ठाकरे यांनी आज कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. हा आढावा घेताना त्यांनी कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.

हवामान विभागाने पाऊस, वादळ आणि इतर आपत्तीविषयी प्रशासनाला अद्ययावत माहिती सातत्याने मिळत राहील तसेच त्यामुळे यंत्रणांना सावध राहून बचाव कार्य करता येईल याची काळजी घ्यावी. मासेमारी बोटींशी या काळात संपर्क असावा. त्यांना देखील सूचना मिळत राहतील ते पहावे. वीज प्रतिरोधक यंत्रणा, जिल्ह्याचे नियंत्रण कक्ष देखील व्यवस्थित कार्यान्वित असावेत याची काळजी घ्यावी, असे ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

तिवरेसारखी दुर्घटना घडू नये म्हणून सावध राहा

गेल्या वेळेस तिवरे धरणाची दुर्घटना घडली होती. यंदा सबंधित सर्व यंत्रणांनी देखील मातीच्या धरणांची देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थित झाल्याची खात्री करून घ्यावी. तसेच आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील सावध करावे आणि आणि त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करून ठेवावी. गेल्या वर्षी देखील पावसाळ्याच्या काळात पालघरमध्ये लहान, लहान भूकंपांची मालिका सुरू झाली होती. हे पाहता तेथील यंत्रणेने देखील सावध राहावे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबई, नवी मुंबईत लवकरच नवीन रडार

या बैठकीत हवामान विभागाचे उपसंचालक के. एस होसाळीकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई या चार ठिकाणी लवकरच नवीन रडार उभारण्यात येत असून त्यामुळे हवामानाचा अंदाज अधिक परिपूर्ण आणि अचूक होऊ शकेल.

- Advertisement -

पूर्वी आपल्याकडे चक्रीवादळाचा धोका नसायचा. पण २०१७ पासून ओखी, वायू, क्यार, निसर्ग यासारख्या चक्रीवादळांनी किनारपट्टीतील भागाचे खूप नुकसान केले. वीज पडण्याचा धोका हा प्रत्यक्ष पावसाळ्यापेक्षा अगोदरच्या काळात म्हणजे एप्रिल, मेमध्ये जास्त असतो असे सांगून होसाळीकर यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने हवामानाचा अचूक अंदाज करणे शक्य झाल्याची माहिती दिली.

यावेळी कोकणातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तटरक्षक दल, मस्त्यव्यवसाय विकास, हवामान विभाग, नौदल यांनी बैठकीत आपापल्या तयारीची माहिती दिली तसेच सूचना केल्या.  बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, प्रधान सचिव मदत व पुनर्वसन असीम गुप्ता,अनुप कुमार, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदींची उपस्थिती होती.


हेही वाचा – राज्यात हजारो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होणार, महानिर्मितीच्या ‘मिशन ऑक्सिजन’ मोहीमेचे काम युद्धपातळीवर- ऊर्जामंत्री


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -