शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी केलेल्या वक्तव्यावरुन भाजपने शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. शिव वडापाव, शिवथाळीच्या यशानंतर आता शिव दवाखाने येणार आहेत, अशी बोचरी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. संजय राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला अधिक कळत, असं वक्तव्य केले होते. यावरुन संजय राऊत यांच्यावर टीका केली जात आहे.
कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. “शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशा नंतर आता येत आहेत शिव दवाखाने…इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील,” अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली.
शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशा नंतर आता येत आहेत शिव दवाखाने…
इथे डॉक्टरांच्या ऐवजी
कंपाऊंडर असतील.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 17, 2020
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत “मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतो. त्याला जास्त कळतं,” असे वक्तव्य केले होते. यावरुन डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मार्डने राऊत यांनी माफी मागण्याची मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली. चहूबाजूंनी होत असलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून कोटी झाली. गैरसमज कुणी करू नये, माफी मागण्यास काही जण सांगत आहेत पण मी अपमानच कुणाचा केलेला नाही त्यामुळे माफी मागणार नाही, असं स्पष्टीकरणात म्हटले. कोरोना संकटाच्या काळात देवदुतासारखे धावून आले. त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. अशा डॉक्टरांविषयी आम्हाला नेहमीच आदर आणि आस्था आहे. अपमान आणि कोटी यातील फरक समजून घ्या, माझ्या बोलण्यामागची भावना समजून घ्या, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – संजय राऊत बोलले आणि वादळच आलं; जितेंद्र आव्हाड आले मदतीला धावून