विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वेगवेगळी गुप्त भेट घेतली. भाजप नेत्यांच्या दिल्लीवारीमुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यावर देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना हा दावा फेटाळला आहे.
भाजपमध्ये कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. नव्या मंत्र्यांच्या भेटीगाठीसाठी आम्ही दिल्लीला जात आहोत. तसंच महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी हा दौरा आहे. राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचीही चर्चा नाही. आशिष शेलार आणि चंद्रकांत बावनकुळे यांच्या नावांची चर्चा प्रदेशाध्यक्षपदी सुरु आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी ही चर्चा फेटाळली आहे. प्रदेश अध्यक्ष बदलण्याची कुठेही चर्चा नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अतिशय चांगलं काम करत आहेत. पक्ष, हायकमांड त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आशिष शेलारांचं स्पष्टीकरण
चंद्रकांतदादा यांच्या नेतृत्त्वात पक्ष पंढरपूरसह राज्यातील अनेक निवडणुकांमध्ये चांगलं काम करत आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांच्या नेतृत्त्वाची पक्षाला गरज आहे. आमच्या नावांची जी चर्चा सुरु आहे त्याला काहीच अर्थ नाही, असं आशिष शेलार म्हणाले.
नेत्यांच्या दिल्लीदौऱ्यावर चंद्रकांतदादांचं स्पष्टीकरण
नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याचा काहीही राजकीय हेतू नाही. विशेषत: देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार हे मोठ्या प्रमाणात दिल्लीत येत असतात. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांचं दिल्लीत येणं हे कॉमन आहे पण आम्ही आलो हे विशेष आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.