घरमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रईडीचा धाक दाखवूनच भाजपने फोडले शिवसेनेचे आमदार

ईडीचा धाक दाखवूनच भाजपने फोडले शिवसेनेचे आमदार

Subscribe

नाना पटोले यांचे संगमनेरमध्ये काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठकित वक्तव्य

संगमनेर : देशात बेरोजगारी व महागाईचा डोंब उसळला आहे. मात्र, त्यावरून लक्ष हटवण्यासाठी केंद्र सरकार विरोधकांवर सूड भावनेतून ईडीच्या कारवाया करत आहे. ईडी व तत्सम केंद्रीय यंत्रणा या पूर्णपणे राजकीय उद्देशातून वापरल्या जात आहेत. ईडीचा धाक दाखवूनच भाजपने शिवसेनेचे आमदार फोडले असून, महाविकास आघाडी सरकार पाडले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विविध पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विधिमंडळ घटनेते आमदार बाळासाहेब थोरात होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शहराध्यक्ष किरण काळे, बाबासाहेब ओहोळ, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, करण ससाने, मधुकर नवले, संजय छल्लारे, विनायक देशमुख ,मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, दादा पाटील वाकचौरे, डॉ. एकनाथ गोंदकर, संभाजी माळवदे, पंकज लोंढे, सोमेश्वर दिवटे, राहुल दिवे, रामहरी कातोरे, सुभाष सांगळे, गौरव डोंगरे, संतोष हासे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

आमदार नाना पटोले म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्ती व स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीसाठी काँग्रेसने महत्त्वपूर्ण काम केले आहे. मात्र, मागील आठ वर्षात धार्मिकतेच्या नावावर राजकारण सुरू असून, देशाच्या लोकशाहीला व संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरात 9 ते 14 ऑगस्ट या काळात आजादी गौरव यात्रा काढण्यात येणार असून, लोकशाही वाचवण्यासाठीच पुन्हा एकदा काँग्रेसची लढाई सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा विविध वक्तव्यांमधून अवमान करणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभले आहेत .देशाच्या लोकशाहीला निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी काँग्रेस जणांनी पुन्हा एकदा मोठी लढाई करायची आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिन ते 14 ऑगस्ट या काळात होणार्‍या आजादी गौरव या सर्व तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी सक्रिय सहभाग नोंदवत काँग्रेसचा विचार हा घराघरापर्यंत पोहोचवा.

आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेसला मोठ्या त्यागाचा व बलिदानाचा इतिहास आहे. काँग्रेस हा गोरी गरिबांच्या शाश्वत विकासाचा विचार करणारा पक्ष आहे. अनेक संकट आली तरीही काँग्रेसने सर्वधर्मसमभावाचा विचार सोडला नाही. ज्या देशामध्ये सुई बनत नव्हती त्या देशांमध्ये आता रॉकेटसारखे उत्पादन होत आहे. हे सर्व काँग्रेसची देण आहे .मात्र सातत्याने भुलथापा देऊन खोटे बोलून भाजपा जनतेची दिशाभूल करत आहे. ईडीच्या कारवाई हा राजकीय हेतूने होत असून हे लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. अहमदनगर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून, आजादी गौरव यात्रेनिमित्त प्रत्येक तालुक्यात पदयात्रा काढून काँग्रेसचा विचार हा घराघरात पर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसजणांनी सज्ज व्हावे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही पदाधिकार्‍यांनी काँग्रेसचा विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे. आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, भाजप हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची दिशाभूल करत आहे. चुकीच्या गोष्टी सातत्याने सांगून तरुणांना फसवले जात आहे. या भुलथापांपासून तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी आपल्या सर्वांना मोठी लढाई करावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -