राज्यकर्त्यांनी नेहमीच आपला वैयक्तिक स्वार्थ पाहिला. लोकशाहीतील राजांनी दिलं तरी काय? असा सवाल करत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज लोकशाहीच्या नावाखाली देशात घराणेशाही आली त्याच घरातील लोक सत्तेत येऊ लागले आहे. लोकांना ज्ञान आहे आणि इतरांना नाही असं बिंबवल जात आहे. त्यामुळे विकेंद्रीकरणाची संकल्पना मागे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
उदयनराजे म्हणाले की, थोर पुरुषांनी लोकांसाठी आपलं आयुष्य झिजवलं, वाटेल त्या परिस्थितीत लोकांच कल्याण व्हावं, लोकं मोठी व्हावीत, त्यांचा विकास व्हावा हा त्यांचा ध्यास होता. पण महापुरुषांची वारंवार बदनामी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचीही वेगवेगळ्या मार्गांनी बदनामी केली जातेय. चित्रपट आणि वक्तव्यातून ही बदनामी होतेय. ही विकृती दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतचं आहे. ती वेळीच रोखली पाहिजे, असं आवाहनही खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
जग खूप वेगाने पुढे जातेय. लोक फारसा विचार करत नाहीत. लोकांनी विचार करायचं बंद केलं आहे. प्रत्येकाचे जीवन व्यस्त झालं आहे. लोक कामात व्यस्त आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या मूलभूत विचारांचा लोकांना विसर पडू लागला आहे. हे एका दिवसात झालं नाही, अशी खंतही उदयनराजे भोसले यांनी बोलून दाखवली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला, तो विचार राहिला आहे का? कारण नसताना जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे. भेदभाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे सर्वधर्म समभाव हा विचार मागे पडताना दिसत असल्याचेही उदनराजे म्हणाले.
सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, सर्वसामान्यांच्या हाती सत्ता आली पाहिजे, अशी गांधीजींची भूमिका होती, पण ते झालं नाही, आज घराणेशाही निर्माण झाली आहे, मूठभर लोकांच्या हाती सत्ता आली आहे. राजकारणात घराण्याची मक्तेदारी वाढली आहे, अशी टीका उदयनराजे भोसलेंनी केली आहे.
आपण इस्लामिक देश पाहिले तर तिथे आजही राजेशाही आहे, राजेशाही अस्तित्वात ठेवावी असं शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर आजही या देशात राजेशाही राहिली असती. लोकांचा राज्यकारभारात सहभाग असावा असं शिवाजी महाराजांना वाटल आणि लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली, असंही त्यांनी नमूद केले.