नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झालेली भेट, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा यामुळे राज्यातील राजकारणातील संभ्रम वाढला असून राष्ट्रवादीबाबतचा संभ्रम लवकरच दुर होईल असे सुचक वक्तव्य करत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राजकारणातले गुढ अधिकच वाढवले आहे.
नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना महाजन यांनी बोलतांना सांगितले की, राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही. अजित पवार, छगन भुजबळ तसेच दिलीप वळसे पाटील हे भाजपबरोबर येतील असे वाटले होते का, असा प्रश्न जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबात बोलतांना त्यांनी केला. सध्या सत्तारूढ पक्षांमध्ये खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू असली तरी कोणाला कोणते खाते द्यायचे हे नेते ठरवतील आणि सर्व संमतीने यावर निर्णय होईल. यावरून सध्या सरकारमध्ये कोणतेही ताणतणाव नसल्याचे महाजन म्हणाले. ध्वजारोहणासाठी मंत्र्यांना वेगवेगळे जिल्हे देण्यात आले त्यामुळे पालकमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहे याबाबत विचारले असता पालकमंत्री पदाबाबत काहीच वाद नाही. छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री व्हावे असे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत असेल तर गैर नाही असे ते म्हणाले.
पालकमंत्री पद बदलणार का?
राज्यातील मंत्र्यांना पालकमंत्री पदांचे वाटप 15 ऑगस्टपूर्वी केले जाईल, असे मानले जात असताना आता केवळ झेंडा वंदनासाठी मुख्यमंत्री यांनी मंत्र्यांना जिल्ह्यांचे वाटप केल्याने पालकमंत्रीपदाचे वाटप आणखी लांबणीवर पडले आहे. मंत्रिमंडळाचा अधिवेशनानंतर विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. 4 ऑगस्टला अधिवेशन स्थगित झाले होते. तथापि, 15 ऑगस्टपूर्वी हा विस्तार होण्याची शक्यता नाही. त्यामुळे झेंडा वंदनापुरते जिल्ह्यांचे वाटप मंत्र्यांना करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना पालकमंत्री पद मिळालेले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अन्य बरेच मंत्री असे आहेत की ज्यांच्याकडे दोन ते तीन जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांना पालकमंत्री पदही मिळालेले नसून आगामी मंत्री मंडळ विस्तारानंतर हा सुटणार असल्याचे दिसते.