घरठाणेठाण्यात 350 रुपयांना मिळणारी कोरोना बॉडीबॅग मुंबईत 6 हजार 700 रुपयांना, श्रीकांत...

ठाण्यात 350 रुपयांना मिळणारी कोरोना बॉडीबॅग मुंबईत 6 हजार 700 रुपयांना, श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई : कोविड काळात सर्वसामान्य नागरिक जीव वाचवण्यासाठी आटापीटा करत असताना मुंबई महापालिकेत मात्र त्यांना लुटण्याचे काम सुरू होते. त्यावेळी बॉडीबॅग ठाण्यात अवघ्या 350 रुपयांना मिळत असताना, त्याच बॅगेसाठी मुंबई महापालिका तब्बल 6 हजार 700 रुपये का मोजत होती, असा प्रश्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असे बिरुद मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेची आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट महापालिका अशी ओळख, उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीत झाली असल्याचा आरोप डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. कोविड काळात एकीकडे माणसे मरत होती व हे मात्र त्यांना लुटायचे काम करत होते, इतकी वर्षे उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात महापालिका असतानाही मुंबईकरांच्या, मराठी माणसांच्या आयुष्यात फारसे बदल घडलेले दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.

- Advertisement -

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्याऐवजी आधी आपल्या पालिकेतील कार्यकाळाचे उत्तर जनतेला द्यावे, असे ते म्हणाले. आमच्यावर खोके खोके असा आरोप करणाऱ्यांनी कुणाला किती खोके मिळाले, हे लवकरच एसआयटीच्या चौकशीतून समोर येईल हे विसरू नये. ईडीच्या चौकशीत सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांचे धागेदोरे कुणापर्यंत गेले आहेत, हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. वसवा येथील शिवसेना शाखा क्रमांक 59 येथे आयोजित केलेल्या शाखा संपर्क कार्यक्रमात डॉ. श्रीकांत शिंदे बोलत होते. यावेळी खासदार गजानन कीर्तीकर, नरेश म्हस्के, सिद्धेश कदम, सुशांत शेलार, अमेय घोले उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत सत्ता असताना मराठी माणसांना, शिवसैनिकांना काय मिळाले याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मराठी माणसांना मुंबई सोडून ठाणे, कल्याण डोंबिवलीला जावे लागत आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हेच कारणीभूत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे स्वतः सक्रिय असल्याने प्रशासन देखील सक्रिय झाले आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना बाजूला सारून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बंद करण्यास मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य दिले आहे, असे खासदार शिंदे म्हणाले.

- Advertisement -

स्थानिक समस्यांबाबत बोलताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले, कोळीवाड्यातील घरे छोटी झाली व कुटुंबे मोठी झाली आहेत त्यांना चांगले घर मिळावे यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईतील खरा भुमीपुत्र आगरी व कोळी आहे. कोळीवाड्यासाठी विशेष धोरण आखण्याबाबत सकारात्मक काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिले आहे. एसआरए व म्हाडामध्ये हक्काचे घर मिळतील, यादृष्टीने विचार सुरू आहे. ठाण्याप्रमाणे आम्ही मुंबईत देखील काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -