नाशिक : ’चलो ब्रह्मगिरी..संत बनके, हटावो रोपवे हनुमान बनके, खासदार मठ्ठ, आमदार लठ्ठ, बाळा! धरू नको रोपवेचा हट्ट’ असे विविध फलक हाती घेत नाशिकच्या पर्यावरण प्रेमींनी अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला विरोध केला. एकीकडे गिधाड नामशेष होण्याच्या मार्गावर असून त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. मात्र दुसरीकडे विकासाच्या नावाखाली सर्रास पर्यावरणाचा र्हास केला जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अंजनेरी-ब्रह्मगिरी असा रोप-वेचा तयार करण्याचा घाट घातला जात आहे. नुकतीच या कामासाठी निविदा प्रक्रियाही खुली करण्यात आली आहे. त्यामुळे रोपवे तयार करण्याच्या कामाच्या हालचालींनाही वेग आला आहे. दुसरीकडे नाशिकच्या पर्यावरणप्रेमी संघटनांच्या माध्यमातून ’रोप-वे थांबवा, जटायू वाचवा’ असा नारा देत असून रोपवेला तीव्र विरोध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व परिवाराण प्रेमींनी एकत्र येत ब्रम्हगिरी गाठले, ब्रम्हगिरीला जाणार्या पायर्यांवर जटायू पूजन करत रोपवे अंजनेरीसह ब्रम्हगिरीसाठी धोकादायक असल्याचे सांगितले.
नाशिकसह त्र्यंबकेश्वर शहर कुंभनगरी म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या पंचवटी तपोवनाचा उल्लेख रामायणात केल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार श्रीराम वनवासात असताना पंचवटीत आल्यानंतर याच पंचवटीतून सीतेचे रावणाने हरण केले, तेव्हा ज्या जटायू पक्षाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, तो पक्षी गिधाड होता, असे सांगितले जाते. या गिधाडाचे घर म्हणून अंजनेरी-ब्रह्मगिरीची पर्वतरांग ओळखली जाते. या ठिकाणी गिधाडांचे प्रजनन होते, मात्र सद्यस्थितीत गिधाडांची संख्या कमालीची घटली असून अशातच रोपवेचा घाट घातला जात आहे. त्यामुळे गिधाड प्रजातीवर संकट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.