देशात सर्वाधिक वाहतूकीचे मोठे जाळं असलेल्या भारतीय रेल्वेला सध्या महाराष्ट्राची जीवनवाही असलेली लालपरी ओव्हरटेक करताना दिसून येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी महाराष्ट्रातून रेल्वेच्या २२४ श्रमिक ट्रेन रविवार पर्यंत चालविण्यात आलेल्या आहेत. ज्यामधून अडीच लाखा पेक्षा जास्त मजुरांची वाहतूक करण्यात आली आहे. मात्र गेल्या आठ दिवसात एसटी महामंडळाने तब्बल २ लाख १ हजार ९८८ श्रमिक, मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहचविण्याचे काम केलं आहे.
लॉकडाउनमध्ये देशात विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाकडून कामगार दिनी म्हणजे १ मे पासून विशेष श्रमिक ट्रेन चालविण्यात येत आहेत. सध्या देशात अडकून पडलेल्या मजुरांची संख्या महाराष्ट्रात फार मोठी आहे. त्यामुळे मागील १७ दिवसात महाराष्ट्र राज्यातून तब्बल २२४ श्रमिक ट्रेन चालविण्यात आलेल्या आहेत, ज्यामधून २ लाख ९२ हजार अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यात आलं आहे. मात्र तरी सुद्धा रेल्वेच्या श्रमिक ट्रेन अपुऱ्या पडत असल्याने, राज्यातील अनेक स्थलांतरित मजूर आपला जीव धोक्यात घालून पायपीट करत आपल्या राज्यात जात होते. पायपीट करत जाणाऱ्या श्रमिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत निःशुल्क सुखरूप सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. तेव्हा पासून रविवारपर्यंत एसटी महामंडळाच्या बसेसमार्फत तब्बल २ लाख १ हजार ९८८ श्रमिक -मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहचविले आहे. त्यासाठी एसटीच्या हजारो चालकांनी अहोरात्र मेहनत करून तब्बल १५ हजार ३६७ बसेसद्वारे ही बहूमोल कामगिरी करून दाखवली आहे. अर्थात, या चालकांना एसटीच्या इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांबरोबर राज्य परिवहन विभागाचे देखील बहुमोल सहकार्य लाभलं आहे.
हेही वाचा – कोरोनाशी लढण्यासाठी ‘हा’ काढा ठरतोय प्रभावी; संस्थेचा दावा
ओडिसा, आसामपर्यंत धावली एसटी
राज्य शासनाच्या निर्देशानुसार २३ मार्चपासून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यानां दळणवळणाची सेवा एसटी मार्फत पुरविण्यात येत आहेत. त्याचबरोबर ९ मे पासून एसटीच्या बसेस आपल्या गावी जाण्याच्या ओढीने भर उन्हा-तान्हात कुटुंबासमवेत पायपीट करणाऱ्या श्रमिकांना त्यांची विचारपूस करून त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप सोडण्याचं काम एसटी महामंडळाचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. श्रमिकांनीसुद्धा एसटी महामंडळाचे आभार मानले आहेत. एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, फक्त सीमेपर्यंत नाही, श्रमिकांनी विनंती केली तर आम्ही महाराष्ट्राची सीमेपासून भाडे आकारून त्यांना जिल्ह्यांपर्यंत सोडण्यात येत आहे. नुकतंच एसटी महामंडळाने आसाम, ओरिसा राज्यात अनेक एसटी बसेस पाठविल्या आहेत.
या संकटकाळात राज्यातून मोठ्या प्रमाणात कुटुंबासमवेत पायपीट करत श्रमिक गावाकडे निघाला आहे. त्यामुळे यांना राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप सोडण्याचं काम एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. या श्रमिकांना सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहे. तसेच गोरगरीब श्रमिकांची सेवा करताना आम्हाला आनंद होत आहे.
राहुल तोरो, वाहतूक महाव्यस्थापक, एसटी महामंडळ