पावसाळी अधिवेशनाचा चहापानाचा कार्यक्रम रद्द होतो, विचारलेले प्रश्न व्यपगत होतात. महाविकास आघाडी सरकारने सर्व लोकशाहीचे नियम, कायदे पायदळी तुटवत लोकशाहीला लावलेले हे कुलूप आहे. त्यांच्याकडून चहापानाची अपेक्षा ही वेड्यासारखी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आयुध वापरायला दिले जात नाही, अधिवेशन घ्यायचे नाहीत अशा प्रकारचा बचावात्मक प्रयत्न सत्ताधारी सरकारमार्फत होत आहे. पण या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनातही आम्ही सरकारचा चेहरा उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही, असेही फडणवीस म्हणाले. तुमच्याकडे बहुमत आहे, तर विधानसभा अध्यक्ष पदासारखे पद रिकामे का ? असाही सवाल त्यांनी केला. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
राज्यातील १०० प्रश्नांची तयारी आम्ही केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पिकविम्याचा प्रश्न, दुधाचा भाव, धान्य घोटाळा अशा अनेक पातळीवर शेतकरी सध्या अडचणीत आहे. अधिवेशनाच्या काळात आयुध वापरता येणार नसतील प्रश्नच उपस्थित करता येणार नाही. आमच्याकडे १०० हून अधिक वेगवेगळे विषय आहेत. पण या विषयावर बोलणारच असाही आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. राज्यात कोरोनाची परिस्थिती, कोरोनाने झालेले मृत्यू, म्यूकरमायकोसिस, लॉकडाऊनची स्थिती, १२ बलुतेदार, विविध घटकांचे प्रश्न, पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये रखडलेले रस्ते आणि मेट्रोचे प्रकल्प, राज्यात थांबलेली गुंतवणुकीचा ओघ, विविध खात्यातील भ्रष्टाचार यासारखे विषय हे अधिवेशनाच्या निमित्ताने मांडणार आहोत. सभागृहात जे मांडता येईल ते मांडू. लोकशाहीला कुलूप लावल्याने लोकशाही थांबवता येते असे कोणाला वाटत असेल, तर लोकशाही थट्टा थांबवायला हवी असे ते म्हणाले. कोरोनाच्या नावे सगळे संपवले जाते, पण बाकी सगळ्याच गोष्टी सुरू आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमकपणे सगळ्या गोष्टी मांडू असेही फडणवीस म्हणाले.
शिवसेना भाजपमध्ये शत्रूत्व नाहीच, फक्त वैचारिक मतभेद
शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये शत्रूत्व कधीच नव्हते, फक्त वैचारिक मतभेद होते. निवडणूकीमध्ये ज्या पक्षाने आमचा हात धरून विरोधी पक्षाविरोधात निवडणूक लढवली, तीच शिवसेना निवडणूकीनंतर मात्र विरोधकांचा हात धरून गेली. त्यामुळे आमच्यात आणि शिवसेनेत शत्रूत्व नाही, पण वैचारिक मतभेद आहेत असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेना उद्या आमच्यासोबत येण्यासाठी तयार असेल तर या जर तरच्या गोष्टी नाहीत, काळ पाहून निर्णय घेता येईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे आशीष शेलार यांच्यात झालेली भेट ही माझी मुलाखत घेण्यासाठीची तयारी म्हणून झाली असावी असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.