राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत शुक्रवारी ईडी कार्यालयात जाऊन चौकशीसाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज त्यांनी ट्विट करत ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, असे आवाहन केले आहे. उद्या (दि. २७ सप्टेंबर, शुक्रवार) दुपारी दोन वाजता शरद पवार मुंबईस्थित ईडी कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांचा पाहुणचार स्वीकारणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.
ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला, अशी बातमी आल्यानंतर काल राज्यभरात विविध ठिकाणी बंद पाळण्यात आला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको, निदर्शने करण्यात आली. तसेच मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन देखील केले. या सर्वांची पार्श्वभूमी पाहता शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्या शांत राहण्याचे संकेत दिले आहेत. “ईडी कार्यालय परिसरात गर्दी करु नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता राखावी”, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे.@MumbaiPolice @NCPspeaks
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 26, 2019
त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 26, 2019
राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासहीत आजी-माजी ७० संचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात शरद पवार यांचे देखील नाव गोवण्यात आले आहे. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत ईडीच्या निर्णयाचे स्वागत केले. “मी कधीही कोणत्याही बँकेच्या संचालक मंडळावर नव्हतो. तरिही ईडीला याबाबतीत माझ्याशी काही चर्चा करायची असेल तर मी स्वतःहून त्यांच्याकडे जातो. कारण आचारसंहिता असल्याकारणाने मला राज्यव्यापी दौऱ्यावर जायचे आहे.” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
Please take care and make sure that people are not inconvenienced.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 26, 2019