महाराष्ट्र वक्फ बोर्ड जमीन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. वक्फ बोर्डाच्या जमीन व्यवहार गैरप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत गुरुवारी पुण्यातील ७ ठिकाणी छापे टाकले. हे प्रकरण वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीशी संबंधित आहे. विशेष म्हणजे वक्फ बोर्ड हे मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे क्रुझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबी आणि तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत अनेक मोठे गौप्यस्फोट केले. तसंच, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. या सगळ्या घडामोडी घडत असताना ईडीने मारलेल्या धाडी यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.
Maharashtra | Enforcement Directorate is conducting raids at seven locations in Pune, in connection Waqf Board land scam case
— ANI (@ANI) November 11, 2021
नवाब मलिकांचे फडणवीसांवर गंभीर आरोप
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना १४ कोटी ५६ लाखाच्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकलं, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.
१४ कोटी ५६ लाखाच्या बोगस नोटा ज्या पकडण्यात आल्या. त्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ‘हायड्रोजन बॉम्ब’ टाकला. बीकेसीमध्ये (८ ऑक्टोबर २०१७) बोगस नोटांचे कनेक्शन आयएसआय, पाकिस्तान व्हाया बांग्लादेश यांच्यामार्फत बोगस नोटा संपूर्ण देशात पसरवल्या गेल्या. ८ ऑक्टोबरच्या छापेमारीत १४ कोटी ५६ लाख पकडण्यात आले. मुंबईत एकाला अटक झाली. एकाला पुण्यात अटक करण्यात आली. त्यामध्ये इम्रान आलम शेख, रियाज शेख यांची अटक झाली. नवीमुंबईमध्येही कारवाई झाली. पंरतु १४ कोटी ५६ लाख बोगस नोटांमधून ८ लाख ८० हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले.
पाकिस्तानची बोगस नोट भारतात चालावी? प्रकरण दाखल होते आणि काही दिवसातच जामीन मिळतो. हे प्रकरण NIA कडे दिले जात नाही. नोटा कुठून आल्या. याची अंतिम चौकशी झाली नाही. कारण जे बोगस नोटांचे रॅकेट चालवत होते, त्यांना तत्कालिन सरकारचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.