रुग्णांना आपातकालीन वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी महाराष्ट्रात १०८ नंबरची रुग्णवाहिकेची सेवा सुरू करण्यात आली आहे. पण, आता ही सेवा फक्त आपातकालीन सुविधेसाठी पुरेशी राहिलेली नाही. या सेवेचा फायदा गर्भावस्थेत असणाऱ्या महिलांनाही मोठ्या प्रमाणात होत आहे. १०८ नंबरची आपातकालीन रुग्णवाहिकेची सेवा गेली ४ वर्ष सेवेत आहेत. या सेवेमुळे आतापर्यंत २९ हजार नवजात बालकांचा जन्म झाला आहे. म्हणजेच रुग्णवाहिकेत किंवा त्याच आजूबाजूच्या परिसरातील आलेल्या इमर्जन्सी कॉल्समुळे गर्भवती महिलांची तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहचेपर्यंत प्रसूती झाल्याचं समोर आलं आहे. तर, दर दिवशी सरासरी २० नवजात बालकांचा जन्म झाला आहे.
महाराष्ट्रात १० हजार ८४ बालकांचा जन्म
याच वर्षी फक्त रुग्णवाहिकेच्या मदतीने महाराष्ट्रात १० हजार ८४ बालकांचा जन्म झाला आहे. ग्रामीण भागात या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे १०८ रुग्णवाहिका सेवा हाताळतात, त्यांना ग्रामीण भागातून अधिक रात्रीच्या वेळेस इमर्जन्सीचे कॉल्स येतात. याच कारणास्तव सेवा २४ तासात सुरू ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय, जे डॉक्टर रुग्णांना हाताळतात त्यांना प्रत्येक इमर्जन्सी कॉल्सबाबत प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
पुण्यातील संख्या सर्वाधिक
२९ हजार नवजात बालकांपैकी १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे सर्वात जास्त पुण्यात (२ हजार ४३९) बालकांचा जन्म झाला आहे. त्यानंतर नाशिक (२ हजार ०७), सोलापूर (१ हजार ६६०), सातारा (१ हजार ४६१) औरंगाबाद (१ हजार १८७ ) आणि बीड (१ हजार १३७ )
राज्यात तीन प्रकारच्या इमर्जन्सीचे कॉल्स
प्रसूतीच्या संख्येविषयी बोलताना ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितलं, “संपूर्ण राज्यात सर्वात जास्त तीन प्रकारच्या इमर्जन्सीचे कॉल्स येतात. जिथे १०८ रुग्णवाहिकेची सेवा मोठ्या प्रमाणात पुरवली जाते. एक म्हणजे, आपातकालीन प्रसूती, अपघात आणि वैद्यकीय आजार. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी १०८ रुग्णवाहिका गर्भधारणेच्या प्रकरणांमध्ये अधिक वापरली जाते. त्याशिवाय, नागरिकांसाठी ही सेवा २४ तास सहज उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीचे अंतर पार करुन लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं सोपं होतं.”
मातांच्या मृत्यूदरातही घट
गेल्या ४ वर्षात प्रसूतीबाबतचे सर्वात जास्त कॉल्स हे पुण्यातून आले आहेत. आतापर्यंत पुण्यातून ६९ हजार ०७१ कॉल्स आले आहेत. त्यामागोमाग, नाशिकहून ५२ हजार ०२७ कॉल्स आले आहेत. सोलापूरहून ४२ हजार ६१२ केसेसचे कॉल्स आले आहेत. अहमदनगर हून ४१ हजार ३९४ कॉल्स आणि कोल्हापूरहून ३९ हजार ८९१ कॉल्स आले आहेत. डॉ. शेळके पुढे म्हणाले, “या २९ हजार नवजात बाळांचा जन्म १०८ या रुग्णवाहिकेत उपलब्ध असणाऱ्या डॉक्टरांनी अगदी सुरक्षित आणि काळजीने केले आहेत. त्यामुळे मातांच्या मृत्यूदरातही घट झाली आहे. ही एक अतिरिक्त सेवा आहे. ज्याचा फायदा सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात होतो आहे.”
३५ जिल्ह्यांमध्ये १०८ नंबरच्या ९३७ रुग्णवाहिका
महाराष्ट्रात २०१४ मध्ये ही रुग्णवाहिका सेवा सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच गेल्या चार वर्षांत रुग्णवाहिका सेवेने ३३ लाख ९५ हजार ८६३ कॉल्सला प्रतिसाद दिला आहे. आकडेवारीनुसार, आजार, गर्भधारणा आणि रस्ते अपघात यासाठीच सर्वात जास्त कॉल्स आले आहेत. राज्यात ३५ जिल्ह्यांमध्ये १०८ नंबरच्या ९३७ रुग्णवाहिका आहेत. १० नोव्हेंबर २०१८ पर्यंत ८.३० लाखांहून अधिक कॉल्स गर्भधारणेच्या केसेसचे आहेत.
मुंबईत ७०९ प्रसूती
मुंबईत या रुग्णवाहिकेत आणि त्या आजूबाजूच्या परिसरात २०१४ ते २०१८ या कालावधीत एकूण ७०९ नवजात बालकांचा जन्म झाला आहे. २०१८ मध्ये ५७२ नवजात बाळ सुखरुप जन्माला आली आहेत.