घरमहाराष्ट्रबियाण्यांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी समन्वय ठेवा; दादा भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश

बियाण्यांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी समन्वय ठेवा; दादा भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषी विभागाने जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनासोबत समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. या काळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषी विभागाने जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनासोबत समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी दिले. गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. हे लक्षात घेता यंदा पेरणीपूर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके आयोजित करतानाच शेतकऱ्यांमध्ये जागृतीसाठी विशेष मोहीम घेण्याचे निर्देशही भुसे यांनी यावेळी दिले.

मंत्रालयात कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांच्या बियाण्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व बियाणे उत्पादकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषी सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, संचालक दिलीप झेंडे, तसेच बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisement -

जिल्हानिहाय पीक पद्धती लक्षात घेऊन मागणीप्रमाणे पिकांचे बियाणे पुरवठा करण्यावर कंपन्यांनी भर द्यावा. काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषी विभागाने समन्वयाचे काम करावे. त्यासाठी कृषी आयुक्तालय पातळीवर नव्याने स्थापित करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्ष उपयोगी ठरेल, असे भुसे यावेळी म्हणाले.

मागील वर्षी सोयाबीन बियाणांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. हे लक्षात घेऊन पेरणीपूर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके जास्तीतजास्त प्रमाणावर आयोजित करावीत. तसेच अशा प्रात्यक्षिकांच्या दरम्यान कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषी सेवा केंद्राचे प्रतिनिधी यांनी शेतकरी वर्गात जाणीव जागृती निर्माण केल्यास मोठा सकारात्मक बदल होऊन आगामी वर्षात बियाणे उगवणशक्तीच्या तक्रारी कमी होण्यास मदत होऊ शकेल, असेही भुसे यांनी नमूद केले.

- Advertisement -

सोयाबीनसाठी अतिरिक्त बियाणे पुरवठा करावा

सर्वच पिकांच्या बियाणे पुरवठा नियोजन आराखड्याप्रमाणे करत असतानाच राज्यासाठी विशेष बाब म्हणून सोयाबीन या पिकासाठी १० ते २० टक्के जास्तीचा बियाणे पुरवठा करावा असे आवाहन दादा भुसे यांनी सोयाबीन बिजोत्पादक कंपन्यांना केले. महाबिज कंपनीद्वारे राज्यात सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे गतवर्षीप्रमाणेच ठेवले आहेत. त्यात दरवाढ करण्यात आलेली नाही. याबाबत खासगी कंपन्यांनी देखील पुढाकार घेऊन त्यांच्याकडील सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे शेतकरी बांधवांना परवडतील असे ठेवण्याबाबत आवाहन यावेळी भुसे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -