महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु त्याची महाराष्ट्र पोलिसांनी पूर्ण तयारी केलेली आहे. कुठल्याही प्रकारे अशांततेचं वातावरण निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. जे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर कडक कारवाी करु, असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्याचे पोलीस महासंचालकांना सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठका घ्यावीत आणि त्या बैठकिमध्ये ज्या ज्या सूचना येतील त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. कुठलाही निर्णय घेताना दोन्ही बाजूंनी काय परिणाम होतील तपासून घेऊन त्या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका ठरवावी. एकदा पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तांच्या पातळीवर चर्चा झाली मग आम्ही परत एकदा मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलू आणि त्यांतर निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
राज्यात ३ तारीखनंतर काही होईल असं मला वाटत नाही, आम्ही तयार आहोत. कायदा व सुव्यस्था नियंत्रणात राहील याचा आम्ही प्रयत्न करतोय. कुठल्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे समाजामध्ये तेढ, अशांतता निर्माण होत असेल तर अशी कुठलीही कृती कारवाईला पात्र ठरते. त्याप्रमाणे संबंधितांवर मग ती व्यक्ती असो की संघटना त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं अशांत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय हे खरं आहे, असं वळसे पाटील म्हणाले.
रमझानच्या महिन्यानंतर दंगे घडवण्याचे इनपुट्स माझ्याकडे नाही आहे. आम्ही आयबी आणि रॉ बरोबर बोलून फिल्ड इनपूट घेणार, असं देखील गृहमंत्री म्हणाले.
अमरावतीत काही घटक सक्रीय
अमरावती दंगली घडतायत. एका विशिष्ट भागामध्ये घटना घडत आहेत याचा अर्थ तिथे काही घटक जास्त सक्रीय आहेत. त्या सक्रीय घटकांचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
महागाईच्या मुद्द्यावरुन लक्ष वळवण्यासाठी हे सर्व सुरु
आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवरुन वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरु आहे. केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपने जास्त चर्चा करायला पाहिजे ती चर्चा महागाई संदर्भामध्ये करायला पाहिजे. रोजगारीच्या संदर्भामध्ये करायला पाहिजे. जे-जे विषय देशाच्या समोर आहेत त्यावर चर्चा करायला पाहिजे. आपल्या देशाच्या सीमांच्या सुरक्षेबाबत चर्चा करायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीकडचं लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात आहेत. काही लोक त्याला सामील होत आहेत, असं वळसे पाटील म्हणाले.