महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नुकताच १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. मात्र बोर्डाने जाहीर केलेल्या निकालावर विद्यार्थ्यांचा काही आक्षपे किंवा तक्रार असल्यास ती नमुन्यामध्ये (प्रपत्र -अ) अर्जाद्वारे कळविता येणार आहे. २५ सप्टेंबर २०२१ अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. याबाबतची माहिती संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भातील तक्रारी आणि आक्षेप सोडवण्य़ासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
यातील अधिकारी तक्रार निवारण अधिकारी म्हणून विभागीय मंडळातील विभागीय सहसचिव म्हणून काम पाहणार आहेत. या तक्रार निवारण अधिकारी म्हणजेच विभागीय सहसचिवांचे पत्ते, संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी जाहीर करण्यात आले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना आपल्या १२ वीच्या निकालाबाबत काही तक्रार किंवा आक्षेप असतील तर ते टपाल, ईमेल किंवा संबंधित अधिकाऱ्यांना व्यक्तीश: भेटून आपल्या तक्रारींचे निवारण करु शकतात. यासाठी मंडळातर्फे नमूना अर्ज जाहीर करण्यात आला आहे. अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना हा नमूना अर्ज उपलब्ध आहे. तक्रार निवारण अधिकाऱ्यातर्फे तक्रार मिळाल्यानंतर पुढील दहा दिवसांच्या आत हा अर्ज निकाली काढला जाणार आहे. यासंदर्भात विद्यार्थ्याला पत्र किंवा ईमेलद्वारे माहिती कळविण्यात येणार आहे. यावरील उत्तरावर देखील विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास ते संबंधित विभागीय मंडळातील विभागीय सचिव, विभागीय अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधू शकणार आहेत.