शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज, गुरुवारी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाहांच्या नावाने कोट्यवधी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप आज संजय राऊत यांनी सोमय्यांवर केला आहे. तसेच मी रोज एक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढणार आणि आतापर्यंत लोकांनी माझ्याकडे आणून दिलेली किरीट सोमय्यांसंबंधित २११ प्रकरणे आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
‘त्या धिंडेत तुम्ही सामील झालात तर लोकं तुमचे कपडे काढतील’
आज माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘किरीट सोमय्यांनी फडणवीसांच्या नावाखाली शेकडो कोटी रुपये गोळा केल्याची प्रकरणे माझ्याकडे आलेली आहेत. आता फडणवीस आणि भाजपने यांचे उत्तर द्यावे. जे काही लोकं सोमय्यांच्या बाजूने बोलतायत, त्यांनी बोलून नका, नाही तर तुम्ही उघडले व्हाल. चंद्रकांत पाटील आणि इतर लोकं उगाच बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना यासारखे चालले आहे. याप्रकरण चंद्रकांत पाटील तुम्ही पडू नका आम्ही काय असे ते बघू. लोकं सोमय्यांनी धिंड काढणार आहेत, त्या धिंडेत तुम्ही सामील झालात तर लोकं तुमचे कपडे काढतील. पवईतील पेरूबाग येथील किरीट सोमय्यांनी केलेला हा पुनर्वसातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हा घोटाळा देवेंद्र फडणवीसांच्या काळात किरीट सोमय्यांच्या लीडरशीपच्या खाली झाला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नावाने पैसा गोळा केला आहे. मी तेव्हाही म्हणालो फडणवीसांकडून हे असे काम होणार नाही. पण त्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. आणि मूळ रहिवाशांवर अन्याय झाला आहे.’
‘या घोटाळ्याचे प्रकरण घेऊन मी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीस जात आहे. काय चाललं या महाराष्ट्रात? या महाराष्ट्रात काय लुटू चालली होती? आणि तुम्ही आम्हाला सांगताय. रोज एक भ्रष्टाचाराचे प्रकरण मी बाहेर काढणार आहे. माझ्याकडे आतापर्यंत लोकांनी समोर येऊन किरीट सोमय्यांची २११ प्रकरणे दिली आहेत. आणि या एकूण घोटाळ्यात गेल्या काही वर्षात किरीट सोमय्यांनी साडे सात हजार कोटी रुपये गोळा केले आहेत.’
पवईतील पेरुबाग घोटाळा नेमका काय?
पवईतील पेरुबाग येथे जवळपास १३८ एकरचा भूखंड आहे. या ठिकाणी पुनर्वसनाच्या नावाखाली ४३३ बोगस लोकांना सोमय्यांनी घुसवले आहे. त्यांचा यावर अधिकार नाही. पण किरीट सोमय्यांच्या एजंटीने बाहेरील ४३३ लोकांना घुसवले. आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोटाळ्याच्या पेपरवर सही केली आहे. या ४३३ लोकांकडून एजंटच्या मार्फत सोमय्यांनी प्रत्येकी २५ लाख रुपये घेतले. हा २०० ते ३०० कोटींपेक्षा मोठा घोटाळा आहे. यामध्ये फडणवीसांना पैसे द्यायचे सांगून सोमय्यांनी वसूली केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे संजय राऊत तक्रार करणार आहेत.