जळगाव : मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो, म्हणूनच मला डावलण्यात आले. मुख्यमंत्रिपदासाठी खान्देशावर कायम अन्याय झाला. मी टरबुज्या म्हणणार नाही पण माझ्या डोक्यावर आणून ठेवला, असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे रेशन कार्ड व बारा अंकी नंबर वाटप कार्यक्रम एकनाथ खडसे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी बोलत असताना एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘ज्या भारतीय जनता पक्षामध्ये चाळीस वर्ष हमाली केली, उभं आयुष्य पक्षासाठी घातलं आणि नाथाभाऊ मुख्यमंत्रिपदापर्यंत आला आणि नाथाभाऊच नाव वगळण्यात आलं’ असं म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘मी टरबुज्या म्हणणार नाही, पण मी मुख्यमंत्रीपदापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला आणि मला मुख्यमंत्री पदापासून डावललं.
मुख्यमंत्रिपदाचा अधिकार हा खान्देशाचा होता, स्वातंत्र्याला 70 वर्ष होऊन गेली मात्र खान्देशावर अन्याय करण्यात आला. 70 वर्षात कोकणात नारायण राणे, मनोहर जोशी तसे तीन मुख्यमंत्री झालेत, विदर्भातील 4 मुख्यमंत्री झाले आणि पाचवा देवेंद्र फडणवीस झाला, मराठवाड्यातील विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झालेत. मात्र नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रिपदाचा अधिकार असतानाही सत्तर वर्षात एकदाही संधी देण्यात आली नाही. चाळीस वर्ष पक्षात आम्ही हमाली केली, मात्र अधिकार असतानाही मुख्यमंत्रिपदापासून डावलण्यात आल्याची खंत ही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली.