घरमहाराष्ट्र'प्रसंगी रजेवर जाईन, पण नको त्या बदल्यांच्या लिस्टवर सही करणार नाही' -...

‘प्रसंगी रजेवर जाईन, पण नको त्या बदल्यांच्या लिस्टवर सही करणार नाही’ – पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल

Subscribe

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मुदत येत्या १५ ऑगस्ट रोजी संपत आली असतानाही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घोळ काही मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलटपक्षी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून कडक पवित्रा घेतला आहे. प्रसंगी रजेवर जाणे पसंत करू मात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या लिस्टवर सही करणार नाही, असे पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दात कळवले असल्याचे सांगण्यात येते. पोलीस महासंचालकांनी बदल्यांना खोडा घातल्यामुळे राज्यातील महाआघाडी विकास सरकारला येत्या सात सप्टेंबरपर्यंत पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी चौथ्यांदा मुदतवाढ घेण्याची वेळ ओढवली आहे.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी पोलीस आस्थापना मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील तीन वरिष्ठ पोलीस महासंचालकांना समावेश असतो. या आस्थापना मंडळाचे अध्यक्ष स्थान राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांच्याकडे आहे. तर मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि ज्येष्ठ सनदी पोलीस अधिकारी बिपिन कुमार सिंह असे तिघे ज्येष्ठ पोलीस अधिकारी आस्थापना मंडळावर आहेत. मात्र या आस्थापना मंडळांमध्येही सर्वात ज्येष्ठ पोलीस अधिकारी असलेले संजय पांडे यांचा समावेश नाही. त्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांनाच स्वतःच्या जबाबदारीवर वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत. या बदल्या करताना काही वाद झाल्यास त्याची जबाबदारी राज्याचे पोलीस प्रमुख म्हणून पोलीस महासंचालकांवर येणार आहे. राज्याच्या गृह मंत्रालयाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्या गुणवत्तेवर व कामाच्या निकषावर न करता स्वतःच्या राजकीय नेत्यांच्या मर्जीतील पोलीस अधिकाऱ्यांना झुकते माप देत बदल्या सुचवल्या असल्याचे राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाच्या बदल्यांच्या यादीनुसार बदल केल्यास त्यामध्ये पोलीस महासंचालकांवर आरोप होऊ शकतात. तसेच गुणवत्ताधारक पोलीस अधिकाऱ्यांना डावलले गेल्यास कोर्ट बाजी देखील होऊ शकते. त्यामुळे या वादात अडकून स्वतःचे करिअर पणाला लावण्यापेक्षा पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गृहमंत्रालयाच्या यादीवर आपण सही करणार नाही. वाटल्यास मी रजेवर निघून जाईल, अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. पोलीस महासंचालकांच्या या कडक पवित्र्याने राष्ट्रवादीच्या गोटात मात्र कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

- Advertisement -

महाआघाडी विकास सरकारमध्ये गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे. तर सामान्य प्रशासन खाते हे शिवसेनेकडे अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. मात्र राज्यातील आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर निश्चित होत असतात. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणावर करत असताना राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्यातील बदल्यांबाबत मात्र वेगळाच सूर उमटू लागल्यामुळे राष्ट्रवादीतील अस्वस्थता अधिक वाढीस लागली आहे. मुळातच राज्यात कोरोनाचा उद्रेक असल्यामुळे चालू आर्थिक वर्षात सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. मात्र ही स्थगिती जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उठवण्यात आली आणि ३१ जुलैपर्यंत १५ टक्के अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात महाआघाडी विकास सरकारने मान्यता दिली. मात्र ३१ जुलैपर्यंतही बदल्यांबाबत एकमत होऊ न शकल्यामुळे १० ऑगस्टपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. तोपर्यंतही सरकार आणि पोलीस महासंचालक यांच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत एकमत न झाल्याने १५ ऑगस्टपर्यंत तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. यावेळेला मात्र पोलीस महासंचालकांनी गृहमंत्रालयाकडून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीवर सही करण्यात स्पष्ट नकार दिला. प्रसंगी रजेवर जाणे पसंत करू, मात्र अशा लिस्टवर आपण सही करणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.

या साऱ्या घडामोडींमुळे गृहखाते असलेल्या राष्ट्रवादीत मात्र प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. यापूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल हे रॉ यासारख्या संघटनेमध्ये कार्यरत असल्यामुळे जयस्वाल आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे संबंध सुमधुर आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी पण त्यांचे संबंध विश्वासाचे आहेत. जयस्वाल यांना सेवानिवृत्त होण्यास अद्याप अडीच वर्षांचा कालावधी असून ते केंद्र सरकारच्या सेवेत जाण्यास अधिक इच्छुक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील आपल्या कारकिर्दीला ते कोणताही डाग लावून डाग लावून घेऊ इच्छित नाहीत. मात्र यामुळे राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आता ७ सप्टेंबरपर्यंत रखडल्या आहेत. त्यानंतरही नवरात्र उत्सव, दिवाळी असे सण तोंडावर असल्यामुळे दिवाळीपर्यंत घरी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

राज्यातील जिम तत्काळ सुरू करा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -