मराठवाड्यामध्ये दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणी समस्येवर उपाय योजन्याची मागणी करण्यासाठी राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं. औरंगाबादमध्ये त्यांनी केलेल्या या उपोषणाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आदी भाजपचे दिग्गज नेते देखील उपस्थित होते. मात्र, आता पंकजा मुंडेंच्या या उपोषणावर औरंगाबादमधली एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘जेव्हा सरकार होतं, तेव्हा तुम्ही काय गोट्या खेळत होतात का?’ असा सवाल त्यांनी या आंदोलनावर उपस्थित केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या सवालावरून औरंगाबादमध्ये भाजप विरूद्ध एमआयएम असा वाद पेटण्याची शक्यता आहे.
‘तेव्हा पाणीप्रश्न का सोडवला नाही?’
मराठवाड्यातला पाणीप्रश्न सुटायला हवा, अशी मागणी करत पंकजा मुंडेंनी औरंगाबादमधल्या विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण केलं. मात्र, त्यावर इम्तियाज जलील यांनी तोंडसुख घेतलं आहे. ‘गेल्या ५ वर्षांपासून केंद्रातही आणि राज्यातही तुमचंच सरकार होतं. मग तेव्हा इथला पाणीप्रश्न का सोडवला नाही? आता या मुद्द्यावर नौटंकी कशाला करता? ५ वर्ष सत्तेत असताना गोट्या खेळत होतात का?’ अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे.
‘सत्ताधारीच नाही, तर तुमचे समर्थक देखील असेच प्रश्न विचारत आहेत. सत्ता गेल्यानंतर आता औरंगाबादमध्ये तुम्ही आंदोलन करत आहात. हे न समजण्याइतकी जनता मूर्ख नाही’, असं देखील जलील यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस देखील उपोषणात उपस्थित
दरम्यान, या आंदोलनावेळी उपस्थिती लावलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सरकारने जलयुक्त शिवार योजना बंद करू नये आणि वॉटर ग्रीड योजनेला चालना द्यावी’, अशी मागणी केली. अशा काही मागण्यांचं निवेदन यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना देण्यात आलं आहे.