मुंबई : जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना काल, शुक्रवारी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केला. पोलिसांकडून झालेला हा लाठीमार तसेच हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 2, 2023
या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासीयांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – आंदोलनाचा भडका, बंदची हाक; नाशिकमध्ये फाडले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर
राज्याच्या काही भागांत बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे. दगडफेक, जाळपोळ, हिंसाचारात आपल्या राज्याच्याच संपत्तीचे नुकसान होत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेक, जाळपोळ हिंसाचार टाळला पाहिजे. आजपर्यंत शांततेच्या, लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन यापुढेही त्याच मार्गाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. राज्याच्या काही भागांत सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी मराठा समाज बांधव, मराठा संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केले आहे.
हेही वाचा – …मी गप्प बसणार नाही, जालन्यातील घटनेनंतर छत्रपती संभाजी राजेंची आक्रमक भूमिका
राज्याच्या साधनसंपत्तीचे नुकसान होणार नाही. आंदोलनामुळे आपल्या माता-भगिनी, बांधवांच्या जीवाला धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तसेच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
मराठा बांधवांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरू असलेला हिंसाचार तात्काळ थांबवला पाहिजे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राहिल, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य, प्रयत्न करूया…, असे सांगत अजित पवार यांनी राज्यातील जाळपोळीच्या, हिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली.