ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलवा-टोलवी सुरु आहे. यामध्येच आता ओबीसींच्या जनगणनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त सवाल केला आहे. कुत्र्या- मांजरांची गणना होते तर ओबीसींची जनगणना का होत नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी संतप्त सवाल केला आहे.
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यस्तरीय ओबीसी आरक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी जनगणनेवरुन संताप व्यक्त केला आहे. तुम्हाला शांत बसून आरक्षण मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला बेंबीच्या देठापासून ओरडावे लागेल. आरक्षण काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. आरक्षण हे शोषित आणि वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे शोषितांना आरक्षण मिळाले पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे. यावेळी आव्हाडांनी कुत्र्या-मांजरांची गणना होते तर मग ओबीसींची जनगणगना का होत नाही? असा संतप्त सवाल केला आहे.
महापौर मंडल आयोगामुळे झाला
मंडल आयोगामुळे महापौर झाला असल्याचे आव्हाड म्हणाले. आपल्याकडे एकूण ३५४ जाती असून अनेक जातीचे लोक आहेत. मी स्वतः ओबीसी आहे पण राजकारण केलं नाही. परंतु आपल्या बांधवांसाठी लढावे लागणार आहे. आदिवासी आणि भटका समाज्याच्या डोक्यावर आजही छप्पर नाही. अनेकदा आपण मागासवर्गीय असल्याचे सांगण्यास काहींना लाज वाटते. तुमच्यामधील महापौर हा मंडल आयोगामुळे निर्माण झाला आहे. सोलापूरमध्ये कलाल समाजातील पहिली महापौर झाली तीसुद्धा मंडल आयोगामुळे. हा दारु विकणारा समाज असून पूर्वी शिंप्यांची काम करत होते. त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव आहे परंतु महाराष्ट्रात जातीबाबत ओळख नाही असे आव्हाड म्हणाले.
ओबीसी समाज पुढे जात असल्याने खुपतोय
ओबीसी समाज पुढे जातोय त्यामुळे काही लोकांच्या डोळ्यात खुपायला लागले आहे. एखाद्या घरकाम करणाऱ्या मातेचा मुलगा इंजीनियर होत असल्यामुळे डोळ्यात खुपत आहे. तुमच्या घरात फुले- आबे़डकरांचा फोटो लावा. शहरीकऱणामुळे १०० मुलांपैकी ८ जण पदवीधर आहेत. ओबीसींमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण वाढलं असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.