मुंबईः खारघर दुर्घटनेत ५० श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र सरकार खरा आकडा लपवत आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, खारघरमधील घटनेत काही जणांचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाला आहे. पैसे देऊन सत्य लपवण्याचे काम सध्या भाजपकडून सुरु आहे. माझ्याकडे काही कार्यक्रते आले होते. त्यांनी मला ही माहिती दिली. त्यामुळे याप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवून कारवाई झाली पाहिजे.
पालघर येथे साधूंची हत्या झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपने आंदोलन केले होते. आता श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना फडणवीस भेटायला गेले नाहीत. त्यांची संवेदनशीलता मेली आहे. भाजपवाले गप्प बसले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
महाराष्ट्रात सध्या मोघलाई सुरु आहे. पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलं जातंय. त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जात आहेत. आमचे आमदार नितीन देशमुखे हे पाण्यासाठी आंदोलन करत होते. तेथे खारं पाणी येत. नवजात बालक ते पाणी पितात. त्यांना याचा नाहक त्रास होतो. या पाण्यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होत आहेत. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून नितीन देशमुख हे आंदोलन करत होते. त्यांना फडणवीसांच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. विरोधी पक्षनेते असताना फडणवीस यांनी आंदोलन केले होते. आता ते दुसऱ्यांना आंदोलन करु देत नाहीत. तसेच विविध मुद्द्यांवर लोकांना आंदोलन करु दिली जात नाहीत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरीही सरकार गप्प आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
पुढे खासदार राऊत म्हणाले, राष्ट्रवादीत जे काही सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही. त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. पण महाविकास आघाडीवर मी बोलतच राहणार आहे. राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे हे सत्य आहे. सत्य मी बोलणारच आहे.