घरमहाराष्ट्रअमित शहांच्या आशीर्वादाने जानकर 'बिनविरोध'

अमित शहांच्या आशीर्वादाने जानकर ‘बिनविरोध’

Subscribe

पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज मागे घेण्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेत्यांनी आपलं मत मांडलं आहे. 'अर्ज मागे घेण्याच्या कृतीवरुन भाजप हा त्यांच्या मित्र पक्षाचा मान राखतो', असा संदेश गेल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज ऐनवेळी मागे घेतला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भाजपची उमेदवारी न घेता रासपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या परवानगीची त्यांना वाट पाहावी लागल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. अमित शहा यांनी रविवारी पुण्यात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत चर्चा केली असता, त्यातूनच हा तोडगा काढल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे पृथ्वीराज देशमुख यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला आणि महादेव जानकरांची बिनविरोध निवड झाली. अर्ज मागे घेण्याच्या मुद्द्यावरुन ‘भाजप हा त्यांच्या मित्र पक्षाचा मान राखतो’, असा संदेश गेल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे.

हे होते अन्य उमेद्वार

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपाचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी १२ वा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत वाढली होती. मात्र, आज भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. रासपाचे उमेदवार आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, भाजपाचे विजय गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील आणि निलय नाईक, शिवसेनेचे अॅड. अनिल परब, मनिषा कायंदे, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे शरद रणपिसे, वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.

- Advertisement -

फुंडकरांच्या जागी जानकरांची वर्णी?

महादेव जानकरांनी रासपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या उमेदवारीत अडथळा निर्माण झाला होता. महादेव जानकरांना भाजपच्या कोट्यातून उमेदवारी देण्याचे निश्चित झाले होते. मात्र जानकरांनी रासप पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली. या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी भाजपने पृथ्वीराज देशमुख यांना शेवटच्या क्षणी सहावा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर जानकरांना पुढील महिन्यात संधी देणार असल्याचा विचार भाजपमध्ये सुरु असल्याची चर्चा होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -