चंद्रपूर : इंडिया आघाडीवाले राज्यात वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सत्तेत आले तेव्हा त्यांनी फक्त स्वत:चा विकास केला. कमिशन आणा किंवा काम थांबवा हेच इंडिया आघाडीचे आणि काँग्रेसचे धोरण आहे. काँग्रेस ही समस्यांची जननी आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरातील सभेतून काँग्रेसवर निशाना साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडी यांच्यावर जहरी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोमवारी (ता. 08 एप्रिल) चंद्रपुरात जाहीर सभा पार पडली. चंद्रपूरचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली-चिमूरचे भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही सभा आयोजित करण्यात आली होती. (Lok Sabha Election 2024 PM Narendra Modi venomous criticism of Congress from meeting Chandrapur)
चंद्रपुरातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून सुरुवात केली. चंद्रपुरात उन्हाचा पारा वाढतो आहे, तसेच राजकीय वातावरणही तापतं आहे. मात्र तुमचा जोश, उत्साह अजिबात कमी झालेला नाही. लोकसभा 2024 ची निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता याच्यामधली निवडणूक आहे. एकीकडे भाजपाप्रणित एनडीए आहे. या एनडीएचे ध्येय हे देशासाठी मोठे निर्णय घेण्याचे आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडि आघाडी आहे, त्यांचा मंत्र आहे की, जिथे सत्ता मिळेल तिथे खूप मलाई खावी. इंडि आघाडीने नेहमी देशाला अस्थितरतेकडे नेले आहे. एका स्थिर सरकारची आवश्यकता किती आहे हे महाराष्ट्राशिवाय कोणाला माहीत असेल, असे म्हणत मोदींनी विरोधकांवर जहरी टीका केली.
इंडि आघाडीवाले राज्यात वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सत्तेत आले तेव्हा त्यांनी फक्त स्वत:चा विकास केला. स्वत:च्या कुटुंबाचा विकास केला. कोणाचा किती वाटा असेल, कोणाला कोणते कंत्राट मिळेल, मलाईदार पोस्ट कोणाच्या खात्यात आणि किती येणार या हिशोबातच यांनी पूर्ण महाराष्ट्राचे भविष्य गुरफटून टाकले होते. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित कोणताही प्रोजेक्ट पाहिल्यावर हे म्हणायचे की, कमिशन आणा किंवा कामा थांबवा. हेच यांचे धोरण आहे. या लोकांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. बळीराजा जलसिंजवनी योजना बंद केली. विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनासाठी योजना होती ती योजनाही त्यांनी ठप्प केली होती, अशी माहिती पंतप्रधान मोदींकडून देण्यात आली.
हेही वाचा… Lok Sabha 2024 : शक्तीला संपवण्याचे स्वप्न धुळीला मिळेल; फडणवीसांचा राहुल गांधीवर निशाणा
त्याशिवाय, विदर्भाच्या विकासासाठी मी ज्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले त्यालाही या लोकांनी विरोध केला होता. या लोकांनी मराठवाड्याची सिंचन योजना बंद केली. कोकणात रिफायनरी प्रोजेक्ट थांबवला, मुंबईत मेट्रो प्रकल्प रोखला होता, पीएम आवास योजनेसाठी केंद्रातून पैसे आल्यानंतरही त्यांनी गरिबांना घर देणे बंद केले होते. त्यांचं लक्ष एकच होते, ते म्हणजे कमिशन आणा किंवा कामावर रोख लावा. आमच्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी या सर्व योजनांना सुरू केले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडि आघाडी आणि काँग्रेसवर सडकून टीका केली.