सांगली – सांगली लोकसभेत तिरंगी लढत नक्की झाली आहे. काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. आज (सोमवार) दुपारी तीन पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. विशाल पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवत संजय पाटील सांगली लोकसभेतून अपक्ष लढण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे. या जागेसाठी काँग्रेसचे विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजीत कदम आग्रही होती. सांगली काँग्रेसनेच लढावी आणि विशाल पाटील यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी विश्वजीत कदम यांनी दिल्ली वारी देखील केली. पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन सांगली मतदारसंघ आपल्याकडेच असला पाहिजे, यासाठी कदम आणि विशाल पाटील यांनी आग्रह धरला होता. मात्र शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर करुन टाकली होती. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या बदल्यात सांगली आम्हाला मिळाली असल्याचे तेव्हा वक्तव्य केले होते.
महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. त्यामुळे इथे आता तिरंगी लढत होणार आहे. भाजपने विद्यमान खासदार संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील रिंगणात आहेत. तर काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांनीही उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे सांगलीत तिरंगी लढत होत आहे.
हेही वाचा : Lok Sabha 2024 : वाढता वाढता वाढे… सांगलीच्या खासदाराची संपत्ती 5 वर्षांत 29 कोटींनी वाढली
काँग्रेस नेते विशाल पाटील यांना समजावतील असे संजय राऊत म्हणाले होते. मात्र विशाल पाटील यांना समजावण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आले. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे चंद्रहार पाटील यांची अस्वस्थता वाढली आहे. महाविकास आघाडीतील या बंडखोरीचा फायदा भाजप उमेदवार संजय पाटील यांना होण्याची शक्यता आहे.
सांगली लोकसभेसाठी आता 21 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाला प्रत्येक बूथवर दोन ईव्हीएम मशिन्स लावाव्या लागणार आहेत.
हेही वाचा : Lok Sabha 2024 : विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी…, काय म्हणाले सत्यजीत तांबे?
Edited by – Unmesh Khandale