नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. तर हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. प्रभू श्रीराम मांसाहार करत होते. 14 वर्षे राम वनवासात असताना त्यांनी मांसाहार केला आणि त्यांचाच आदर्श ठेवून आम्हीही मांसाहार करतो, असे वादग्रस्त वक्तव्य आव्हाडांनी काल (ता. 03 जानेवारी) शिर्डीतील पक्षाच्या मेळाव्यात केले. ज्यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. आव्हाड यांच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून राजकीय नेत्यांकडून, संतांकडून आणि सामान्य नागरिकांकडून याबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. नाशिक येथील साधूंनी, संतांनी आणि महंतांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात FIR दाखल केली आहे. तर आव्हाडांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. (Mahant Sudhirdas got angry at Jitendra Awhad’s statement)
हेही वाचा… आव्हाडांच्या वक्तव्यावर Sharad Pawar यांनी भूमिका स्पष्ट करावी; गिरीश महाजनांचा ठाकरेंनाही टोला
नाशिक येथील महंत सुधीरदास पुजारी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज आम्ही पंचवटी पोलीस ठाण्यात संत-महात्म्यांच्या सहीने अर्ज दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही केली आहे. FIR दाखल करण्यात आला आहे. आम्ही अॅडव्होकेट भिडे यांच्या माध्यमातून कोर्टातही अर्ज दाखल करणार आहोत. जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावरुन ज्या पद्धतीचे वक्तव्य वारंवार करत आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत अशी वक्तव्य होतात. त्यामुळे ईशनिंदा विरोधी कायदा महाराष्ट्र शासनाने आणि केंद्राने करावा अशी आमची मागणी आहे. 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येत आहेत. आम्ही त्यांनाही निवेदन देणार आहोत. असा कायदा झाला तर हिंदू देव-देवतांची टिंगलटवाळी थांबेल आणि गुन्हेगारांना शासन होईल. जितेंद्र आव्हाड यांना तातडीने अटक करावी अशीही मागणी आम्ही केली असल्याचे महंत सुधीरदास यांनी सांगितले आहे.
तर, जितेंद्र आव्हाड जे म्हणाले की भाषणाच्या ओघात बोलून गेलो, भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे पश्चात बुद्धी आहे. आमचे असे म्हणणे आहे जर हे आज बोलत असतील तर काल ते नशा करुन बोलत होते का? जर अशा पद्धतीने बोलत होते तर काल नशा केली होती का आव्हाडांनी? त्यांचा असाच लौकिक आहे ठाण्यात हे आम्हाला समजले आहे. हिंदू त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. शिशुपालाप्रमाणेच जितेंद्र आव्हाडांचेही 100 अपराध भरले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया नाशिकमधील साधू, संतांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आव्हाडांना आता आणखी कोणत्या समस्येला सामोरे जावे लागते आणि पोलीस त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.