महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि राज्यातील विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत करोनाला प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुढच्या काही दिवसांत राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आजपासून राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये लॉकडाऊन करण्यात आल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. मात्र दहावी आणि बारावीच्या परिक्षा पुर्ण होणार असल्याचेही देखील टोपे यांनी सांगितले. तसेच ज्या महाविद्यालयाच्या परिक्षा बाकी आहेत, त्या पुढे ढकलण्यात याव्यात असेही निर्देश विद्यापीठांना देण्यात आले आहेत.
करोना बाधित देशांच्या यादीत सात देश होते, त्यात आता दुबई, सौदी अरेबिया, युएस या तीन देशांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच राज्यातील प्रत्येक आयुक्तालयाला १५ कोटींचा निधी देण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले. हा निधी करोनाच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.