महाराष्ट्रात कोरोनाचा धोका आता अधिकच वाढताना दिसत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. शुक्रवारी राज्यात ४७ हजार ८२७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा चार हजारहून अधिकने वाढला. तसेच २०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९१ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०१,५८,७१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,०४,०७६ (१४.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,०१,९९९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आणि १९,२३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Maharashtra reports 47,827 new COVID19 cases and 202 deaths today; case tally 29,04,076 pic.twitter.com/XUxZmaoLLv
— ANI (@ANI) April 2, 2021
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधले. मी आज लॉकडाऊन करत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. येत्या दोन दिवसात मंत्री आणि तज्ज्ञांशी बोलून नियमावली जाहीर करणार अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी महाराष्ट्रात ४७ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असतानाच २४,१२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २४,५७,४९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.६२ टक्के इतके झाले आहे.