राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून या कोरोना बाधित रूग्णांचा आलेख वर-खाली होताना दिसत आहे. राज्यात शुक्रवारी ८ हजार ७५३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. या तुलनेत आज शनिवारी राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी ९,४८९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० लाख ८८ हजार ८४१ झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ५७५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२३,२०,८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,८८,८४१ (१४.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत
सध्या राज्यात ६,३२,९४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात १५३ जणांचा कोरोनाने बळी
कोरोनाबाधित नव्या रूग्णांसह मृतांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी १५६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तर शनिवारी हा आकडा कमी होऊन वाढून १५३ इतका झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख २२ हजार ७२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील Recovery Rate ९६ टक्क्यांवर
यासह आज ८,३९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण ५८,४५,३१५ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६% एवढे झाले आहे. आज नोंद झालेल्या एकूण १५३ मृत्यूंपैकी ९७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २१८ ने वाढली आहे. हे २१८ मृत्यू, सांगली-३४, पुणे-३२, रायगड-३२, सातारा-२२, नाशिक-२१, सोलापूर-१७, नागपूर-१५, ठाणे-१३, हिंगोली-७, जालना-४, लातूर-४, यवतमाळ-३, बीड-२, चंद्रपूर-२, गडचिरोली-२, कोल्हापूर-२, अहमदनगर-१, भंडारा-१, बुलढाणा-१, जळगाव-१, नांदेड-१ आणि रत्नागिरी-१ असे आहेत.