सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका केली आहे. मराठा आंदोलनाला बदनाम करून मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव राज्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे हा डाव हाणून पाडताना हिंसा जाळपोळीसारखे प्रकार थांबवून आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनी आज परिपत्रक काढून सदर आवाहन केले आहे.
नेमकं काय म्हणालेत शरद पवार
मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही. परंतु कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने तसेच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले गेले पाहिजेत. आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या मराठा आंदोलनाला सर्वसामान्यांचा आणि बहुजनांचा पाठिंबा, सदिच्छा प्राप्त झाल्या होत्या. त्याला कुठेही धक्का लागेल असे प्रकार होणार नाहीत. याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य निर्माण केलं होतं. त्या आदर्शांना धक्का लागेल असे आंदोलन करू नका, असे आवाहनही त्यांनी केलंय. आरक्षण मिळवण्यासाठी काही घटनात्मक प्रक्रिया असतात. या प्रक्रियेसाठी वेळ द्यावा लागतो. त्यासाठी शांतता हवी आहे. शिवाय राज्यातील उद्योग धंद्यातील गुंतवणूक थांबेल आणि बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होईल, असे आंदोलन करू नका, असेही त्यांनी म्हटलं आहे.