महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २९ जुलैला जाहीर केलेल्या दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका १७ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना वितरित केल्या जाणार आहेत. शाळांनी विद्यार्थांना विशिष्ट तारखेलाच गुणपत्रिकेसाठी या, असा आग्रह धरू नये, असे निर्देश राज्य मंडळाने शाळांना दिले आहेत.
ऑनलाईन निकाल जाहीर करत राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना गुण पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली हाती. परंतु आता विद्यार्थांना दहावीची गुणपत्रिका सोमवार १७ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गुणपत्रिका वितरणाचे नियोजन करण्यासाठी २२ जुलैला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विभागीय मंडळाकडून शाळांना १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत गुणपत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शाळा विद्यार्थांना गुणपत्रिका वाटप करतील. गुणपत्रिका वाटपावेळी सरकारच्या सर्व सूचनाचे पालन शाळा करतील, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. शाळांमध्ये एकाच वेळी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊन गुणपत्रिका वाटपाचे नियोजन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.