म्हाडा भरती प्रक्रियेतील परीक्षेमध्ये गोपनियतेचा भंग झाल्यानेच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पण यापुढच्या परीक्षेची जबाबदारी म्हाडा घेणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. म्हाडाची परीक्षा देणाऱ्या राज्यातील परीक्षार्थींची मी माफी मागतो असेही ते म्हणाले. तसेच येत्या काळात होणाऱ्या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. म्हाडा परीक्षार्थींचे पैसे परत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दलालांना धडा शिकवण्यासाठी रात्री उशिरा हा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Mhada recruitment postponed exam 2021 will be conducted from mhada only housing minister jitendra awhad)
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0G— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021
म्हाडाच्या अधिकाऱ्यांना परीक्षेतील गोपनियतेबाबत शंका होती. ही शंका अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलून दाखवली होती. गेल्या तीन दिवसांपासून मी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधत होतो. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी पैसे दिल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तसेच मीदेखील दलालांना पैसे परत करण्याचा इशारा दिला होता. एकुणच पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये परीक्षेत गोपनियतेचा भंग झाल्याने तीन जणांच्या टोळीला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली.
या प्रकरणात पेपर प्रिटिंगला जाताना परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या व्यक्तीने हा पेपर आपल्या लॅपटॉपमध्ये ठेवला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पेपर लिक करण्याच्या प्रयत्नात ही दलालांची टोळी होती. पण परीक्षा रद्द केल्याने त्यांना जी गोष्ट साधायची होती ती होऊ दिली नाही, असेही ते म्हणाले. यापुढच्या काळात होणारी परीक्षा ही कोणत्याही त्रयस्त कंपनीकडे घेण्याची जबाबदारी न देता, म्हाडा ही परीक्षा स्वतः घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खऱ्या मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठीच आम्ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचाऱ्यांना रोखण्याचे काम सरकारने केले
या परीक्षेसाठी संभाव्य पेपर फुटीचा धोका लक्षात घेऊनच पोलिसांना सूक्ष्म तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणूनच पेपर फोडणाऱ्या टोळीचे रॅकेट पकडण्यासाठी पोलीस कामाला लागले. सरकार म्हणूनच या प्रकरणात तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळेच सरकार कार्यान्वयित असल्याचेच हे चिन्ह असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कष्टकऱ्यांना न्याय देण्याचे आणि भ्रष्टाचारी लोक मंत्रालयात जाण्यापासून रोखण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना स्पष्ट केले.