पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. मात्र या लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मजूर अडकले होते. लॉकडाऊनमुळे कंपन्या आणि रोजगार बंद झाल्याने त्यांना दोन वेळेचे अन्न मिळणं देखील मुश्कील झाले होते. या मजूर कामगारांना अशी अपेक्षा होती की, हा २१ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर ते आपल्या-आपल्या घरी परतू शकतील, मात्र या लॉकडाऊनची मर्यादा ३ मे पर्यंत वाढवल्याने हे मजूर पुन्हा एकदा आपल्या घराकडे चालत निघाले आहेत.
मजूरांची हाजारो किलोमीटरची पायपीट
काही मजूर नाशिक तसेच नागपूरहून मध्य प्रदेशकडे जात आहेत. या मजूरांपैकी एका महिलेने सांगितले की, लॉकडाऊनमुळे ती नागपूरमध्ये आपल्या कुटूंबासह अडकली होती. १४ एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर वाहतूक सुरू होईल अशी अपेक्षा होती, मात्र लॉकडाऊन वाढवण्यात आला. त्यामुळे एका वर्षाच्या मुलासह दुचाकीवरून घरी निघाल्याचे सांगितले. तर पायी निघालेल्या एका मजूराने असे सांगितले की, लॉकडाऊन संपला नसल्याने नाशिकवरून आपल्या घरी सटाणा येथे पायी प्रवास करत निघालो असून पाच दिवसांपूर्वी हा प्रवास सुरू केला होता, अजून साधारण सहा दिवस लागतील.
वांद्रे स्थानकावर मजूरांची गर्दी
नुकतेच लॉकडाऊन वाढल्यानंतर मोठ्या संख्येने कामगार, मजूर वांद्रे स्थानकावर पोहोचले होते. सर्वांना त्यांच्या घरी परत जायचे होते. वांद्रे स्थानकावर जमलेल्या कामगारांचे असे म्हणणे होते की, त्यांच्याकडे खाण्यासाठी पैसे नाहीत, रोजगार नाही, म्हणून आम्हाला घरी परत पाठविण्याची व्यवस्था करावी. मात्र पोलिसांनी कोणतीही ट्रेन नसल्याचे जाहीर केले होते. असे असतानाही लोकांचा जमाव कमी न झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला.