महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी CAA ला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे असे विधान करत उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले. उद्धव ठाकरेंच्या याच विधानाचा धागा पकडत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर उपहासात्मक टीका केली आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरवर, “लोकसभेत शिवसेनेने CAA ला आपला पाठींबा दर्शवला होता. मात्र राज्यसभेत शिवसेना खासदारांनी CAA, NRC ला पाठिंबा राज्यसभेत विरोध, पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडूक…”, अशा आशयाचे ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
लोकसभेत CAA NRC ला पाठिंबा राज्यसभेत विरोध , पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा ,वाघ आहे का बेडूक…..
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 22, 2020
CAA वर नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सीएए, एनपीआर, एनआरसीच्या मुद्द्यांवर पंतप्रधानांसोबत माझी चर्चा झाली. या मुद्द्यांवर यापूर्वीच मी माझी भूमिका सामनामध्ये मांडली आहे. सीएएला घाबरण्याचं काहीही कारण नसून हा कायदा कुणालाही देशातून काढण्यासाठीचा कायदा नाही आहे. मुस्लिमांनाच त्रास होणार अशा प्रकारचे एनआरसी कायद्याबाबत जे वातावरण तयार केले जात आहे ते चुकीचे आहे. सगळ्यांनाच आपल्या नागरिकत्वासाठी रांगेत उभे रहावे लागणार आहे. या मुद्द्यावरुन ज्यांनी आंदोलन भडकवले आहे त्यांनी कायदा आणि इतर गोष्टी समजून घ्यायला हव्यात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.