राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे लसीचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लसींचा निर्माण झालेला तुटवडा याकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
गेल्या वर्षी कोव्हिड-१९ ची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्र राज्याला या साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले होते. तेव्हापासूनच महाराष्ट्रात, निव्वळ आकड्यांमधे मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यू देखील झाले आहेत. आज सारा देश कोव्हिड-१९ च्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातली परिस्थिती सर्वात बिकट आहे.
कोव्हिड-१९ ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी, यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण अजूनही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?
या पार्श्वभूमीवर करोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १०० टक्के लसीकरण करण्याची रणनिती महाराष्ट्रासाठी महत्वाची व कळीची आहे. म्हणूनच, महाराष्ट्राला १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून, राज्यातल्या सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवं आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ तर हवीच आहे, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.