परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यासह अनेक भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीनसह अनेक पिकं कापून ठेवली होती. मात्र पावसामुळे ही सर्व पिकं खराब झाल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यासंदर्भात मनसे अध्य राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मागणी पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. राज ठाकरेंनी हे पत्र आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवर आज शेअर केलं आहे. राज ठाकरे यांनी हे पत्र शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ओला दुष्काळ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरेंनी पत्रात नेमक काय म्हटले?
राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले की, या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे. एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेले आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे चांगलच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा”, असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. @CMOMaharashtra pic.twitter.com/BsjqkGJWTY
— Raj Thackeray (@RajThackeray) October 20, 2022
“सरकारने पंचनाप्याचे आदेश दिले आहेत, पण पूर्वानुभवानुसार प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत. गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील, हे पहावे आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते, ती पुरेशी नाही तिचादेखील पुनर्विचार करावा”, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
“दिवाळी हा आनंदाचा सण आहे. खरंतर लॉकडाऊनच्या संकटानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं” अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाला परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे युद्धपातळीवर पंचनामे करत, मदत द्यावी असे निर्देश दिले आहेत.