मुंबई -: नागपाडा, कामाठीपुरा येथील एका इमारतीमध्ये गुरुवारी लागलेल्या आगीतून 15 पेक्षा जास्त नागरिक बचावल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी दुपारी बोरिवली येथे आग लागलेल्या एका बहुमजली इमारतीमधून 35 जणांची सुखरूपपणे वेळीच सुटका केल्याने तेही बचावले.
प्राप्त माहितीनुसार, बोरिवली ( पश्चिम) , पद्मानगर, चिकूवाडी येथे एसआरए योजनेच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या तळमजला अधिक 24 मजली पॅराडाईज हाईट्स या बहुमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी 12.25 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळताच इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक रहिवाशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्काळ इमारतीच्या बाहेर धाव घेतली. तर 35 पेक्षाही जास्त रहिवाशांना अग्निशमन दलाने व स्थानिक नागरिकांनी धावपळ करून वेळीच इमारतीबाहेर काढल्याने ते थोडक्यात बचावले.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीची खबर मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन फायर इंजिन व वॉटर टँकर यांच्या साहाय्याने सदर आगीवर एका तासात अथक प्रयत्नांनी सदर आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविली. त्यामुळेच पुढील अनर्थ टळला. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. मात्र आगीमुळे काही प्रमाणात वित्तीय हानी झाली. सदर आग का व कशी काय लागली याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी व पोलीस हे शोध घेत आहेत.