‘संविधान कमजोर करण्याचे सर्वाधिक काम गेल्या पाच वर्षांत झाले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पत्रपरिषद घेऊन देशाचे संविधान आणि लोकशाही वाचविण्याचे आवाहन करावे लागते. हे देशाचे दुर्भाग्य आहे. अशा परिस्थितीत मोदी द्वेष पसवित आहेत. मोदी दहशतवाद संपविण्याची भाषा करतात. मात्र, नथुराम गोडसे दहशतवादी होता, हे कधीच मान्य करीत नाहीत. सावरकर हेसुद्धा गांधी हत्येत सहभागी होते, असे कपूर आयोगाद्वारे नमूद करण्यात आले आहे. मात्र, याबाबत मोदी भाष्य करीत नाहीत. याबाबत मोदींनी माझ्याशी चर्चा करावी, ते माझ्यासमोर पाच मिनिटेसुद्धा टिकाव धरणार नाहीत.’ अशी टीका ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिनचे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी केली आहे.
मोदींनी हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढले
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढले आहे. त्यांनी आपल्या भाषणात हिंदू-मुस्लिम भाषा वापरणे येग्य नाही’, अशी टीका ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिनचे (आयएमआय) अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी केली. ‘पंतप्रधान असलेल्या व्यक्तीने हिंदू-मुस्लिमची भाषा ऐकल्याचे आश्चर्य वाटले नाही’, असेही ते म्हणाले. बहुजन वंचित आघाडीचे नागपूर आणि रामटेक लोकसभ मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार मनोहर डबरासे आणि किरण पाटणकर यांच्या प्रचारार्थ भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एआयएमआयचे असदुद्दिन ओवसी यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही प्रचारसभा जरीपटका परिसरातील इंदोरा मैदान येथे करण्यात आली होती. त्यावेळी ओवेसी बोलत होते.
भाजपने जनतेची लूट केली
भाजपने जनतेची लूट केली आहे, शिवाय काँग्रेस किंवा राष्ट्रवादी जनतेचे भले देखील करु शकत नाहीत. तसेच शरद पवार केवळ त्यांच्या पुतण्याला वाचवू शकतात. त्यामुळे जे तुम्हाला वाचवू शकतात, अशा बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन यावेळी ओवेसी यांनी केले आहे.
काँग्रेसला लकवा मारला आहे
‘वंचित आघाडीला मतदान न करता काँग्रेसला मतदान करा, असा प्रचार जोरात सुरु आहे. मात्र, काँग्रेसला लकवा मारला आहे, हे लक्षात घ्या. मोदी हे रॉबर्ट वाड्राला गजाआड करण्यामागे लागले आहेत. त्यामुळे सोनिया गांधी यांना तिच्या जावयाची चिंता अधिक आहे. ती तुमच्या जागी आधी जावयाला वाचवेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कुणाला तरी जिंकवायचे आहे म्हणूनच नागपूर ज्याची जन्म किंवा कर्मभूमी नाही, असे नाना पटोलेंसारखे उमेदवार नागपुरात पाठविण्यात आले, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.
वाचा – उर्मिला मातोंडकर खासदार बनणार!
वाचा – आचारसंहितेचा भंग: संजय राऊत यांना जिल्हाधिकार्यांची नोटीस