आई-वडील रागवत असल्याने तीन चार शाळकरी मुली शाळेला टप्पा देऊन थेट दिंडोरी येथे फिरायला गेल्या. शाळा सुटली तरी मुली घरी परतल्या नसल्याचे त्यांचा शोध सुरु झाला. यंत्रणांनी मुलींचा शोध घेतला असता, तिन्ही मैत्रिणी पाचव्या मैत्रिणीच्या घरी सुखरुप मिळून आल्या. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
म्हसरुळ पोलिसांच्या माहितीनुसार, मखमलाबादजवळील एका शाळेतील आठवी ते दहावीच्या सर्वसामान्य कुटुंबातील सुमारे १७ वयोगटातील तीन मैत्रिणी शुक्रवारी (दि. ५) रोजी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्याची तयारी करुन मखमलाबाद गावात आल्या. त्यानंतर एकमेकींशी बोलत चौघींनी आई-वडील रागवत असल्याच्या कारणातून शाळेला अचानक सुटी दिली. फिरण्याचा प्लॅन केल्यावर दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा शालेय वेळ कसा घालवायचा यावर विचार करुन थेट रिक्षा बोलविली. चौघी रिक्षेत बसल्या आणि दिंडोरी तालुक्यातील एका गावात पोहोचल्या. त्या विवाह समारंभात सहभागी झाल्या. सायंकाळी पाच वाजेचा वेळ झाल्याने मुली घाबरल्या.
आता घरी कसे जायचे, फार वेळ होईल, आई-वडील ओरडतील याचा धाक जाणवू लागल्याने त्यांनी आणखी प्लॅन आखला. या प्लॅनमध्ये चौघींनी पाचव्या मैत्रीणीस संपर्क साधला. यावेळी चौथी मुलगी आपल्या घरी पोहोचली.रात्री तिघीही या मैत्रिणीच्या घरी पोहोचल्या. ही माहिती वरिष्ठ पोली निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मुलींच्या मैत्रिणीचे घर गाठून तिघींना ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलींकडे विचारणा केली असता, सहजच फिरायला गेलो, आई वडील रागवतात आणि एन्जॉयसाठी फिरायला गेल्याचे तिघींनी सांगितले. याबाबत अनोळखींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.