नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर आणि परिसराचा विकास व्हावा, या उद्देशातून केंद्राच्या प्रसाद योजनेअंतर्गत १५ कोटी रुपयांच्या विकासकामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर येथील प्रसाद योजनेच्या विविध विकासकामांच्या निधीची रक्कम आता ३७ कोटीहून ५२ कोटी इतकी झाली आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग आहे. राज्यातून नव्हे तर अवघ्या देशभरातील भाविक त्रंबकेश्वर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी येत असतात. त्र्यंबक नगरीमध्ये भाविकांचा राबता मोठा असला तरी त्या तुलनेने येथील सोयी-सुविधा अपु र्या आहेत. देशभरातील भाविकांना पुरेशा सोयी-सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून खासदार गोडसे यांनी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला होता.
यातूनच २ वर्षांपूर्वी केंद्राने ’प्रसाद’ योजनेअंतर्गत त्र्यंबकेश्वर येथील विविध विकासकामांसाठी ३७ कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला होता. या निधीतून आजमितीस त्र्यंबकेश्वर येथे विविध विकासकामे सुरू आहेत. केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाने समाधी मंदिर आणि मंदिर परिसरातील १५ कोटंंच्या विविध विकासकामांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
ही कामे होणार
- भाविकांच्या दर्शन रांगेसाठी दालनाची उभारणी
- दर्शन रांग परिसर आणि गर्दीच्या व्यवस्थापना साठीच्या मोकळ्या जागेचे सुशोभिकरण
- प्रशासन कार्यालयासह सभागृह
- प्राथमिकआरोग्य केंद्र स्वच्छता स्वयंपाक घर उभारणी
- सामान ठेवण्याची व प्रतिक्षालयाची दालने , पुस्तक विक्री केंद्र
- सार्वजनिक स्वच्छता गृह उभारणी
- अंतर्गत पादचारी मार्ग व सुशोभिकरण