नाशिकरोड : नाशिक तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर दोन दिवसांपुर्वी झालेल्या मुसळधार पावसाने वंजारवाडी येथे पहाटेच्या सुमारास घराची भिंत कोसळून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मुलास किरकोळ दुखापत तर तीन मुली सुखरुप आहे. दरम्यान आमदार सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप, जिल्हाधिकारी, तहसिलदार, व प्रशासनाकडून घटनास्थळी पाहणी करत तात्काळ शासकीय मदत देण्याच्या प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने नाशिकसह ईगतपूरी, त्र्यंबकेश्वर तालुका झोडपून काढला होता, तत्पुर्वी ३१ आॅगस्ट रोजी नाशिक तालुक्यातील वंजारवाडी भागात ढगफुटी झाली होती, शुक्रवारी (दि.९) पहाटे ३ वाजेच्या सुमारास वंजारवाडी गावात पश्चिम दिशेला असलेल्या कोळीवाडा परिसरातील एका घराची भिंत कोसळली, भिंत पडल्याच्या आवाजाने आजूबाजूचे लोक धावले, पोलीस पाटील त्र्यंबक शिंदे यांनी पोलीस ठाण्याला माहिती देत तत्काळ मदत कार्य सुरु केले, सरंपच ज्ञानेश्वर शिंदे, उपसरपंच बाळू लोहरे, कचरु काळे, संजय म्हसळे यांच्या सह महिला-पुरुषांनी भिंतीचा मलबा काढला, त्याखाली छबु सिताराम गवारी (३८) व त्यांची पत्नी मंदा छबु गवारी (३५) हे रक्ताच्या थारोळ्यात दिसून आले, त्यांचा पाच वर्षाचा मुलगा आयुष यास तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले तर इतर तीन मुली सुखरुप बचावल्या आहेत. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास चंद्रकात भोईर हे करत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती समजताच देवळालीच्या आमदार सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप, अतिरिक्त जिल्हाधिकारी नडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, उप कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, तहसिलदार अनिल दौंडे, गटविकास अधिकारी सारिका बारी, शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सूचना देण्यात आल्या, गावात इतर पंचनामे करण्याच्या सूचना, मृत व्यक्तीच्या मुलांच्या संगोपनाचा मार्ग कसा काढता येईल याबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहे.