विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी अजून तीन वर्षे बाकी आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी आजी-माजी आमदारांसह विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलेल्या सर्व 114 उमेदवारांसोबत चर्चा केली. यावेळी प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी ‘मिशन 114’च्या कामाला लागल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आजी-माजी आमदार आणि विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलेले 114 उमेदवार उपस्थित होते. यावेळी पवारांनी सर्वांकडून मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या तक्रारी आणि सूचनाही जाणून घेतल्या.
या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधला. 2019च्या निवडणुकीत 114 उमेदवारांना तिकीट दिले होते. त्यांची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीला खासदार, मंत्रीही उपस्थित होते. यावेळी एकूण 55 लोकांनी आपली मते मांडली. मतदारसंघातील परिस्थिती, तिथले प्रश्न आदी मुद्दे त्यांनी बैठकीत मांडले. तसेच सरकारकडून असलेल्या अपेक्षाही व्यक्त केल्या. या बैठकीत ज्या सूचना मांडण्यात आल्या आहेत. त्याची नोंद मंत्र्यांनी घेतली आहे. सरकारच्या माध्यमातून या प्रश्नांची सोडवणूक केली जाणार आहे, असे मलिक म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी ओबीसींसाठी जागा आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशीही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे मलिक यांनी स्पष्ट केले.