गणेशोत्सवासाठी दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे. यावर्षी १९ सप्टेंबरला गणेशचतुर्थीला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी दोन दिवसांचे म्हणजेच १७ सप्टेंबरची कोकण रेल्वेच्या गाड्यांची तिकीटं एका मिनिटांत बुक झाली. अवघ्या मिनिटांमध्ये हे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे चाकरमान्यांमध्ये एकप्रकारे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु आता प्रकरणाचे पडसाद आता दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात उमटण्याची शक्यता आहे. याबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
नितेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दखल घेतल्याचं सांगितलं आहे. गणेशचतुर्थीला कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची बुकिंग फुल्ल झाली आहे. त्यामुळे या बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आढळून आला आहे. काही मिनिटांमध्येच या बुकिंग फुल्ल झाल्या आहेत. यासंबंधीत असंख्य चाकरमानी आणि कोकणवासीयांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यामुळे आम्ही याची दखल घेतली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येत्या सोमवारी देशाच्या रेल्वेमंत्र्यासोबत दिल्लीला एका बैठकीचं आयोजन केलं आहे. जेणेकरून ज्या प्रकारचा त्रास कोकणवासीयांना होतोय. तो सर्व त्रास दूर करण्यात येईल आणि गणेशचतुर्थीसाठी त्यांचा प्रवास सुखकर करण्यात येईल, असं आमदार नितेश राणे म्हणाले.
गणपती बाप्पा मोरया !! @BJP4Maharashtra pic.twitter.com/lEV71Hg7u7
— nitesh rane (@NiteshNRane) May 24, 2023
कोकणात दरवर्षी लाखो चाकरमानी गणपतीला जात असतात. त्यामुळे तिकीट दलालांकडून मोठ्या संख्येनं आधीच आरक्षण करण्यात येतं आणि नंतर ही तिकीटं चढ्या दरानं विकली जातात, असं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचं म्हणणं आहे. या दलालांना रोखण्यासाठी आणि हे गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारनं उपाययोजना करण्याची गरज असल्याचं व्यक्त केलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी हा प्रश्न गांभीर्यानं घेण्याची गरज व्यक्त केली आहे. हा गैरप्रकार थांबायला हवा, अशी मागणी ते करणार आहेत.
हेही वाचा : अनिल देशमुखांबाबतच्या ‘त्या’ वृत्ताला संजय राऊतांनी दिला दुजोरा, म्हणाले…