राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उपमुख्यमंत्री पवारांनी बारामती शहरात मोठा भूखंड नियमबाह्यरित्या बळकावल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष या याचिकेच्या सुनावणीकडे लागलंय.
बारामती शहरात सुमारे ३ हजार वर्ग मीटर जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमबाह्यपणे बळकावल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. पवारांनी हा भूखंड आपल्या मर्जीतल्या नगरसेवकाच्या ट्रस्टला ९९ वर्षांच्या करारावर दिल्याचे या याचिकेत म्हटले आहे. सदर भूखंड हा गतिमंद मुलांच्या शाळेसाठी राखीव असताना, त्या जागेवर चित्रपटगृह उभारण्याचा घाट घातला जात असल्याचं सांगितलं जातंय. या याचिकेवर लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्यानं सर्वांचंच लक्ष्य त्याकडे लागलंय.