घरमहाराष्ट्रयंदा पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी लटकली; पर्याय देण्यासाठी पुन्हा समिती स्थापन

यंदा पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी लटकली; पर्याय देण्यासाठी पुन्हा समिती स्थापन

Subscribe

 

मुंबई: केंद्र सरकार, हरित लवाद व न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकार गेल्या वर्षीपासून पर्यावरणपूरक सण व उत्सव साजरे करण्यासाठी पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी आणून शाडू मातीच्या, पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाठी आग्रही आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने व गणेशोत्सव समन्वय समिती, मूर्तिकार यांच्या मागणीला अनुसरून राज्य सरकारने काहीशी तडजोडीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे यंदापासून घरगुती व सार्वजनिक पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याची प्रक्रिया लटकली आहे.

- Advertisement -

पीओपी गणेशमूर्तीमधील प्रदूषणकारी घटक कमी करणे अथवा इतर काही पर्याय उपलब्ध करण्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, यंदा किमान घरगुती गणेशमूर्ती पर्यावरणपूरक म्हणजे शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याबाबत सूचना केली असून पीओपीच्या सार्वजनिक गणेशमूर्तीना यंदा नाईलाजाने मुभा दिली आहे. मात्र पुढील वर्षीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सण, उत्सव साजरा करण्याबाबत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड.नरेश दहीबावकर यांनी दिली.

तसेच,पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची गरज आहे. लोकांमध्ये देखील यासंदर्भात मोठी जागृती निर्माण होत आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक गणेशमूर्ती शाडू मातीच्या बनविण्यात याव्यात व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आवाहन केले आहे.

- Advertisement -

राज्यात पर्यावरणपूरक सण व उत्सव साजरे करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई तसेच कोकणातील मूर्तिकार, सार्वजनिक गणेश मंडळे यांची बैठक पार पडली.
या बैठकीला,आमदार जयंत पाटील, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे कार्यवाह सुरेश सरनोबत उपस्थित होते. तसेच, प्रशासनातर्फे या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आदीं उपस्थित होते.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या समितीत जलसंपदा, ग्रामविकास, पर्यावरण, नगरविकास, विधी व न्याय, या विभागांचे प्रधान सचिव, सदस्य म्हणून तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव हे समितीचे सदस्य सचिव म्हणून असतील. याशिवाय आयआयटी मुंबई, नीरीचे प्रतिनिधी व डॉ शरद काळे, डॉ अजय देशपांडे यांना तांत्रिक तज्ज्ञ म्हणून या समितीत घेण्यात येईल. ही समिती अभ्यास करून आपला अहवाल शासनास सादर करेल.

उत्साह हवा पण निसर्गाची तोडफोड नको
मातीच्या मूर्ती, कागदी लगदा वापरून मूर्ती, किंवा पेंढा वापरून देखील मूर्ती मोठ्या प्रमाणावर तयार होत असून लोक देखील अशा मूर्तींना पसंती देत आहेत. पर्यावरणाचा समतोल ठेवला गेला पाहिजे. सण आणि उत्सव साजरे करायचे पण निसर्गाची तोडफोड नको हे तत्व आपण ठेवले पाहिजे. माती आणि शाडूचे मूर्तिकार असो किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनविणारे असोत, पर्यावरणाची हानी होऊ नये हे यावर सर्वांचेच एकमत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -