पुण्याच्या कोंढवा येथे भर पावसात मध्यरात्री दीड वाजता आल्कन स्टायलस इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ जणांचा हकनाक बळी गेला. या घटनेनंतर राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर इमारतीच्या बिल्डरावर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर प्रशासनाने याप्रकरणी ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आल्चर स्टायल इमारतीच्या पाच भागीदार बिल्डर्स आणि शेजारील जागेवर बिल्डिंग उभारणाऱ्या कांचन डेव्हलपर्सच्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – कोंढवा इमारत दुर्घटनेची सखोल चौकशी करा – मुख्यमंत्री
‘या’ बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी आल्कन स्टायलसचे पाच भागीदार बिल्डर जगदीशप्रसाद अग्रवाल (६४), सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल (३४), राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल (२७), विवेक सुनिल अग्रवाल (२१), विपूल सुनिल अग्रवाल (२१) या पाच जणांविरोधत गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर कांचन डेव्हलपर्सचे पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी यांच्यासह त्यांचे साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर आणि कंत्राटदाराच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोषींविरोधात कठोर कारवाई करणार – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ५ लाखांची तर जखमींना २५ हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.